NCP Merger : झिरवळांनंतर आता आणखी एका आमदाराचे कान टोचले! राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून ठिणगी, नेमकं काय घडलं?
- Reported by:PRANALI KAPASE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
NCP Merger : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शरद पवार गट राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आग्रही असताना दुसरीकडे अजित पवार गटात मात्र मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणखी एका आमदाराची कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्यानंतर आता इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांचीही पक्षाच्या वरिष्ठांनी जोरदार कानउघाडणी केल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. 'विलीनीकरणा'बाबत खोसकर यांनी केलेल्या विधानामुळे पक्षनेतृत्व कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी आमदार हिरामन खोसकर यांनी "पक्षातील ७० टक्के आमदार विलिनीकरणाबाबत अनुकूल आहेत" असे खळबळजनक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विलिनीकरणाच्या मुद्यावर अद्यापही राष्ट्रवादी पक्षात नकारात्मक आणि संवेदनशील वातावरण असल्याचे या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
advertisement
वरिष्ठांकडून कडक सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत वरिष्ठांनी खोसकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. "पक्षाच्या अंतर्गत धोरणांबाबत किंवा विलिनीकरणाबाबत अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही," अशा शब्दांत त्यांची समज काढण्यात आली. तसेच, खोसकर किंवा इतर कोणत्याही आमदारांनी माध्यमांसमोर विलीनीकरणाबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, अशा सक्त सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.
advertisement
राष्ट्रवादीत अस्वस्थता कायम?
नरहरी झिरवाळ यांनी यापूर्वी व्यक्त केलेली नाराजी आणि आता खोसकरांची झालेली कानउघाडणी, यामुळे अजित पवार यांच्या गटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर आमदारांमध्ये दोन गट असल्याचे चित्र या घडामोडींमुळे निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Merger : झिरवळांनंतर आता आणखी एका आमदाराचे कान टोचले! राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून ठिणगी, नेमकं काय घडलं?








