Western Railway: कोणतीही अधिसूचना नाही, थेट कुलूप! पश्चिम रेल्वेच्या 'पार्सल सेवा बंद'ला स्थानिकांकडून विरोध
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पालघर, बोईसर, डहाणू, वाणगाव आणि सफाळा या रेल्वे स्थानकावरून अचानक नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच ही पार्सल सेवा बंद करण्यात आल्यामुळे स्थानिक हजारो व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, बागायतदार आणि आदिवासींचे नुकसान झाले आहे.
पश्चिम रेल्वेवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पालघर, बोईसर, डहाणू, वाणगाव आणि सफाळा या रेल्वे स्थानकावरून सुरू असलेली रेल्वे पार्सल सेवा बंद करण्यात आली आहे. अचानक नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच ही पार्सल सेवा बंद करण्यात आल्यामुळे स्थानिक हजारो व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, बागायतदार आणि आदिवासींचे नुकसान झाले आहे. रेल्वे पार्सल सेवा तोट्यात असल्याचा रेल्वेकडून बोर्ड लावण्यात आला असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. कोणतीही अधिसूचना न देता रेल्वेने ही पार्सल सेवा बंद केली आहे.
पालघर रेल्वे स्थानकातील पार्सल घराला कुलूप ठोकून दरवाजावर केवळ 'डीआरएफ यांच्या आदेशाने' अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे. विरार ते डहाणू रोड मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक फेरीवाल्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या बंदमुळे स्थानिक हजारो व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, बागायतदार आणि आदिवासींचे नुकसान झाले आहे. ही रेल्वे सेवा कमी पैशांत, जलदगतीने देशांतर्गत आणि जगभरात माल पोहोचवला जात होता. कोणताही पूर्व विचार न करता रेल्वेने व्यापारांची पार्सल सेवा बंद केल्यामुळे स्थानिक व्यापारी आपला संताप व्यक्त करत आहेत.
advertisement
एकाच आदेशामध्ये संपूर्ण सेवा बंद करताना त्याचे परिणाम व्यवसायावर किंवा त्यांच्या दररोजच्या कामावर किती फटका बसेल? याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचा संताप स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या अनेक शेतकऱ्यांचे पिके, फळ, फुले, दूध, भाजीपाला, मासे विक्री या पार्सल सेवेवर अवलंबून होते. तर, गुजरातमधून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थांसारखी कृषी उत्पादने, कोंबडी, बकरीसारखी जनावरे आणि मोटरसायकल यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. या सेवेमुळे महाराष्ट्रातीलच नाही तर, गुजरातमधील शेतकर्यांनाही मोठा फटका बसला आहे.
advertisement
दरम्यान, विरार ते डहाणू रोड दरम्यानची पार्सल सेवा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना वसई किंवा वापीला जाऊन आपले पार्सल पाठवावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता आणखीनच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवाय, शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कष्टात आणखीन वाढ होणार आहे. कमी उत्पन्न येत असल्याचं कारण देत, रेल्वेकडून ही सेवा बंद करण्यात आली आहे. खरंतर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांसाठीही ही सेवा फार महत्त्वाची होती. गरजूंसाठी रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही पार्सल सेवा कार्यरत होती, मात्र महसुलामुळे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याची टीका होत आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 4:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Western Railway: कोणतीही अधिसूचना नाही, थेट कुलूप! पश्चिम रेल्वेच्या 'पार्सल सेवा बंद'ला स्थानिकांकडून विरोध








