तटकरे-पटेलांना हटविल्याच्या बातम्या, पक्षांतर्गत संघर्षाची चर्चा, वेगवान घडामोडी असताना पार्थ पवारांचं ट्विट, म्हणाले....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Parth Pawar: पटेल-तटकरे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून पक्षात नवे वादळ उभा राहण्याची दाट शक्यता व्यक्त होत असतानाच खासदार पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचा पदांशिवाय उल्लेख केल्याने त्यांना पदावरून काढून टाकल्याच्या चर्चांनी पक्षात मोठे वादळ उठले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रा पवार विरुद्ध तटकरे-पटेल असा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. त्यामुळे पटेल-तटकरे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून पक्षात नवे वादळ उभा राहण्याची दाट शक्यता व्यक्त होत असतानाच सुनेत्रा पवार यांचे पुत्र, राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांनी पक्षात घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात सुंदोपसुंदीची चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला १० मार्च रोजी लिहिलेले पत्र समोर आले. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली. यावर गेल्या २४ तासांत राष्ट्रवादीतल्या कोणत्याही नेत्याने पुढे येऊन बाजू न मांडल्याने संशयाचे धुके अधिकच गडद झाले होते.
advertisement
तटकरे-पटेलांना हटविल्याच्या बातम्या, पार्थ पवार म्हणाले...
मात्र समाज माध्यमांवर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या संदर्भाने सुरू असलेल्या बातम्या पाहून राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांनी त्यांची बाजू घेणारे ट्विट केले आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या अनेक काळापासून ते पक्षात काम करीत आहेत. त्यांच्या संदर्भाने सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. तथ्यहीन दाव्यांवरून सध्या त्यांच्या संदर्भाने बातम्या सुरू आहेत. नको त्या वादावरून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे पार्थ पवार ट्विटमध्ये म्हणाले.
advertisement
राष्ट्रवादीत कशावरून वाद सुरू झाला? तटकरे-पटेल एकटे कसे पडले?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांना देण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला १६ फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. तर २८ जानेवारीला अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधीदरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला , तो ग्राह्य धरू नये असे सुनेत्रा पवारांनी १० मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवारांनी केला. या पत्रांवरून राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले.
advertisement
सुनेत्रा पवारांच्या पत्रात तटकरे-पटेल पदांविना!
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये फक्त स्वतःच्या पदापुढे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला केला. तसेच खजिनदार म्हणून विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी शिवाजीराव गर्जे यांचा उल्लेख केला आहे. पत्रात तटकरे-पटेल यांच्या नावांसमोर कोणत्याही पदांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांची पदे काढण्यात आली किंवा कसे? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरे-पटेलांना हटविल्याच्या बातम्या, पक्षांतर्गत संघर्षाची चर्चा, वेगवान घडामोडी असताना पार्थ पवारांचं ट्विट, म्हणाले....








