शिवसेना भाजप व्हाया काँग्रेस, अकोट नगरपालिकेतील भाजप–AIMIMच्या अप्रत्यक्ष समीकरणाने राज्यात खळबळ; रडारवर आले BJP आमदार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Akot Municipal Council: अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनाच्या प्रयोगामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजप आणि AIMIM च्या अप्रत्यक्ष समीकरणावरून वाद पेटला आहे. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
अकोट (अकोला): महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात युती जुळणं आणि तुटणं काही नवीन नाही. कधी काही दिवसांत तर कधी काही तासांत सत्ता बदलताना आपण पाहतो. पण अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनेचा प्रकार मात्र वेगळाच ठरला. भाजप आणि AIMIM एकाच सत्तासमीकरणात अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण एकत्र आल्याचे चित्र समोर येताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
advertisement
प्रकरण इतक्यावर थांबलं नाही. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यात हस्तक्षेप करावा लागला आणि अखेर अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
हा वाद केवळ एका नगरपरिषदेच्या अध्यक्षपदापुरता मर्यादित राहिला नाही. भाजपसाठी हा शिस्तीचा प्रश्न ठरला, AIMIM संदर्भात पक्षाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आणि स्थानिक पातळीवरील सत्ता राजकीयदृष्ट्या किती संवेदनशील ठरू शकते, हे अकोटने दाखवून दिलं.
advertisement
काही तास टिकलेली सत्ता आणि त्यानंतरचा गोंधळ
35 सदस्यांच्या अकोट नगरपरिषदेत भाजप सर्वाधिक 11 जागांसह मोठा पक्ष ठरला होता. मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या 18 जागा मिळाल्या नव्हत्या. याच संख्यात्मक अडचणीतून “अकोट नगर विकास मंच” या नावाखाली एक आघाडी उभी राहिली.
advertisement
या आघाडीत AIMIM चे पाच नगरसेवक असल्याची चर्चा बाहेर येताच वाद पेटला. भाजप सातत्याने AIMIM वर ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आला आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तास्थापनेसाठी AIMIM च्या संख्येवर अवलंबून राहावं लागणं, हे पक्षासाठी अडचणीचं ठरलं.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सार्वजनिकपणे स्पष्ट शब्दांत सांगितलं की भाजप किंवा काँग्रेससोबत AIMIM ची कोणतीही आघाडी मान्य केली जाणार नाही. शिस्तभंग झाला तर कारवाई होईल, असाही इशारा देण्यात आला. यानंतर काही तासांतच चित्र पालटलं. AIMIM ने आपले नगरसेवक बाहेर काढले आणि सत्तास्थापनेचा प्रयोग कोसळला.
advertisement
भारसाकळेंना फटका; पक्षाकडून थेट नोटीस
या संपूर्ण घडामोडीत थेट फटका बसला तो आमदार प्रकाश भारसाकळे यांना. पक्ष नेतृत्वाशी चर्चा न करता या सत्तासमीकरणाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विदर्भातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले भारसाकळे स्थानिक राजकारणातील अंकगणित चांगलं समजणारे नेते मानले जातात. मात्र याच व्यवहार्यतेचा फटका यावेळी त्यांना बसल्याचं चित्र आहे.
advertisement
प्रकाश भारसाखळे कोण आहेत?
प्रकाश गुणवंतराव भारसाकळे पाटील हे विदर्भाच्या राजकारणातील अनुभवी नाव आहे. 1990 मध्ये शिवसेनेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 2005 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले, तर 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2012 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 पासून ते भाजपचे आमदार आहेत.
वेगवेगळ्या पक्षांतून गेल्याने त्यांना स्थानिक सत्ताकारण समजून नेता असे समजले जाते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईचा इशारा देणं, हा फक्त अकोटपुरता संदेश नाही, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
अकोटचा वाद एवढा मोठा का झाला?
अकोटमधला प्रश्न केवळ विचारसरणीचा नव्हता, तर थेट आकड्यांचा होता. 35 सदस्यांच्या सभागृहात सात जागांसाठी सगळा संघर्ष झाला. त्या सात जागांमध्ये AIMIM निर्णायक ठरल्याने हा विषय केवळ नगरपरिषदेतला राहिला नाही. अकोला जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. मुस्लिम आणि हिंदू लोकसंख्येचे प्रमाण, बहुकोनी लढती आणि स्थानिक सत्तासंघर्ष यामुळे येथे प्रत्येक हालचाल मोठ्या राजकीय संदेशासारखी पाहिली जाते.
भाजपसाठी धडा, भारसाखळेंसाठी इशारा
या प्रकरणातून भाजपने स्पष्ट संदेश दिला आहे. स्थानिक पातळीवरील सत्तेसाठी पक्षाची मोठी राजकीय भूमिका ओलांडली जाणार नाही. नगरपरिषद असो वा महानगरपालिका, पक्षशिस्त सर्वोच्च राहील.
अकोटचा वाद त्यामुळे केवळ काही तास टिकलेल्या सत्तेचा नाही, तर स्थानिक व्यवहार्यता, पक्षशिस्त आणि राष्ट्रीय राजकीय प्रतिमा यांच्यातील संघर्षाचं उदाहरण ठरला आहे. आणि प्रकाश भारसाकळेंसाठी हा क्षण त्यांच्या स्थानिक प्रभावाची मर्यादा दाखवणारा ठरला, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेना भाजप व्हाया काँग्रेस, अकोट नगरपालिकेतील भाजप–AIMIMच्या अप्रत्यक्ष समीकरणाने राज्यात खळबळ; रडारवर आले BJP आमदार











