advertisement

दूरदृष्टीचे नेतृत्व : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजही प्रेरणादायी

Last Updated:

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा स्मरण. महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांनी सहकार चळवळ, औद्योगिक विकास, कृषी क्षेत्र आणि शिक्षणात मोठे योगदान दिले.

News18
News18
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, प्रगल्भ विचारांचे नेते आणि सहकार चळवळीचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा पुन्हा एकदा स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणाऱ्या या महान नेत्याचे योगदान आजही राज्याला मार्गदर्शक ठरत आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी दक्षिण सातारा (आताचा सांगली) जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात एका सामान्य कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांनी शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधला. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले. साधेपणा, कष्ट आणि दूरदृष्टी या गुणांमुळे ते लवकरच जनतेच्या मनात स्थान निर्माण करू शकले.
advertisement
1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी राज्याच्या विकासासाठी दीर्घकालीन धोरणे आखली. औद्योगिक विकासास चालना देणे, सहकार चळवळीला बळकटी देणे, कृषी क्षेत्राचा विकास आणि शिक्षणाचा प्रसार या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरले.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे मोठे काम त्यांनी केले. साखर कारखाने, सहकारी संस्था आणि विविध विकास योजनांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
advertisement
राष्ट्रीय पातळीवरही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय सैन्याची पुनर्बांधणी करत देशाच्या संरक्षण व्यवस्थेला नवी दिशा दिली.
याच महान नेत्याच्या 113 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रे येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य तपासणी शिबिर, सामाजिक जनजागृती कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
advertisement
मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. हे पद माझ्यासाठी केवळ एखाद्या राजकीय किंवा पक्षाच्या पदापेक्षा खूप मोठे आहे. कारण हे पद एका महान नेत्याच्या नावाशी जोडलेले आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आयुष्य अर्पण केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना या समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते आणि त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या नावामुळे एक वेगळाच आत्मविश्वास आणि अभिमान मनात निर्माण होतो. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याची उर्मी अधिक दृढ होते.
advertisement
आजच्या बदलत्या काळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. सर्वसमावेशक विकास, लोकशाही मूल्ये आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व ही त्यांची ओळख होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे. समाजहित, विकास आणि प्रगतीचा मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. त्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
advertisement
– प्रदीप (आप्पा) कदम
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दूरदृष्टीचे नेतृत्व : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजही प्रेरणादायी
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement