Weather Alert: अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांनी बदलली हवा! महाराष्ट्रात 7 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने ग्रामीण भागातील शेतीचे मोठे नुकसान, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, ३ ते ५ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रावर इराण-अमेरिका युद्धामुळे LPG आणि पेट्रोलचं संकट असताना आता अवकाळी पावसाचंही संकट आलं आहे. त्याचा फटका ग्रामीण भागाला सर्वात जास्त बसला आहे. शेती आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
इतका पाऊस पडत असूनही उकाडा मात्र कायम आहे. पाऊस पडेल तेवढाच वेळ तात्पुरता गारवा जाणवतो. मात्र त्यानंतर उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा चाळीशी पार जात असताना, आता वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थानवर असलेल्या 'सायक्लोनिक सर्क्युलेशन'मुळे अरबी समुद्रातील आर्द्रता महाराष्ट्राकडे सरकत आहे. याचा परिणाम म्हणून ३ ते ५ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
advertisement
महाराष्ट्रात 48 तास कसं राहील हवामान?
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि जळगाव या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहतील.छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ३ आणि ४ एप्रिलला पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. 60 ते 70 किमी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उन्हाचा कडाका कायम असला तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही काही भागात हलक्या सरी कोसळू शकतात. तर मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
का पडतोय पाऊस?
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताच्या उत्तर भागात एक ट्रफ लाईन सक्रिय आहे, जी सिंधपासून अरबी समुद्रापर्यंत पसरली आहे. या प्रणालीमुळे समुद्रातील ओलावा जमिनीवर येत असून, वाढलेल्या तापमानामुळे स्थानिक पातळीवर पावसाचे ढग तयार होत आहेत.
advertisement
विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तिथून येणार्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात हवामान बदललं आहे. अरबी समुद्रातही हवामान बदललं आहे. त्यामुळे तिथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.
महाराष्ट्रात कुठे किती झालं नुकसान
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. अनेक ठिकाणी झाडं कोसळलीये. पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांवर झाडं कोसळलं आहे.
advertisement
कोंढवा परिसरात ज्योती रेस्टॉरंट समोर चारचाकी वाहनावर झाड पडल्याने वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं. पुलाखालच्या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. पुढील पावसाळ्यात काय होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळपासून वादळी वारा आणि गारपीट झाली, त्यामुळे मका, बाजरी, गहू आणि फळबागांना मोठा फटका बसला. जळगावसह धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात पावसाचा जास्त प्रभाव दिसून आला. सांगली, कराड, मनमाड, मावळ, जळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाने धुमशान घातलं. अनेक भागात काही काळासाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 7:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांनी बदलली हवा! महाराष्ट्रात 7 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा








