रंगांविना खेळली जाते होळी, महाराष्ट्रातलं असंही एक गाव, नेमकी ही परंपरा काय?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
होळी म्हटलं की अगदी कलरफुल वातावरण आपल्या डोळ्यासमोर येतं. मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे ज्या गावात रंगांची होळी खेळली जात नाही.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : होळी म्हटलं की अगदी कलरफुल वातावरण आपल्या डोळ्यासमोर येतं. होळीचा सण हा आपण खूप उत्साहात साजरा करत असतो. वेगवेगळ्या रंगांची उधळण, स्पीकर किंवा डिजेवर होळीची गाणी, पाणी आणि बरंच काही सेलिब्रेशनमध्ये असतं. मात्र, आपल्या महाराष्ट्रात असंही एक गाव आहे ज्या गावात रंगांची नाही तर राष्ट्रसंतांच्या विचारांची उधळण केली जाते, जनजागृती केली जाते. साधा गुलाल देखील या गावात खेळला जात नाही. ते गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं सुरगाव आहे. सुरगावतल्या होळीविषयी येथील शेतकरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रसारक, कीर्तनकार आणि सप्तखंजिरी वादक प्रवीण देशमुख यांनी माहिती दिली आहे.
advertisement
गेल्या 27 वर्षांपासून परंपरा
होळीच्या दिवशी सगळीकडे रंग खेळले जातात. एकमेकांना रंग लावून, डीजे वाजवून किंवा काही लोक तर मद्यप्राशन करून साजरी करतात. मात्र राष्ट्रसंतांनी आपल्याला काही विचार दिलेले आहेत आणि त्या विचारधारेवर आम्ही चालतो. त्यामुळे गेल्या 27 वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत आम्ही दरवर्षी साध्या पद्धतीने श्वेत वस्त्र परिधान करून सर्व गावकरी एकत्रित येतो आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणांचे कार्यक्रम, मुलांच्या वकृत्व स्पर्धा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो आणि विशेष म्हणजे सकाळी सर्व गावकरी एकत्रित येऊन प्रभातफेरी काढतात. अशाप्रकारे आम्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून होळीचा सण साजरा करत असतो, असं प्रवीण देशमुख सांगतात.
advertisement
गाव स्वच्छता करून कचऱ्याची होळी
होळी सणाच्या निमित्ताने जवळजवळ एक महिन्याच्या आधीपासून सुरुवात होते. होळीला लागणाऱ्या साहित्याची जुळवा जुळवा करण्यास गावकरी सुरुवात करतात. आणि विशेष म्हणजे पंधरा दिवसा आधीपासून गावाची स्वच्छता करणे सुरू होते. ज्यात अनेक गावकरी सहभाग घेतात. त्यानंतर प्लास्टिकचा कचरा आणि इतर काडीकचरा जमा करून होळीच्या दिवशी तोच कचरा पेटवून त्याचीच होळी साजरी केली जाते. इतर ठिकाणांसारखं वृक्षांचे लाकूड तोडून आणून त्याची होळी आम्ही करत नाही तर कचरा पेटवून गाव स्वच्छ करतो. कारण पर्यावरणाचं रक्षण करणे ही आपली जबाबदारी, असल्याचे मत गावकरी व्यक्त करतात.
advertisement
इतर गावातील लोकही होतात सहभागी
सुरगाव या गावामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळी होळीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. एवढेच नाही तर गावाबाहेरील गुरुदेव प्रेमी आणि सामाजिक कारण सहभागी होणारे मंडळी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. ज्यांना रंग खेळणे आवडत नाही ते इतर गावातील लोक देखील आवर्जून सुरगाव येथील कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात. विशेषतः लहान मुले देखील सकाळी लवकर उठून श्वेत वस्त्र आणि भगवी टोपी परिधान करून प्रभात फेरीमध्ये सहभागी होतात. गावातील ज्येष्ठ मंडळी आणि महिला मंडळी या रॅलीमध्ये राष्ट्रसंतांचे गीत गाऊन आनंद साजरा करतात आणि स्पीकरच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे तसेच संतांचे विचारधाराचे गीत लावून आनंदात भर पडतात.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
March 22, 2024 10:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
रंगांविना खेळली जाते होळी, महाराष्ट्रातलं असंही एक गाव, नेमकी ही परंपरा काय?