वानरांच्या त्रासामुळे गाव आलं एकत्र, ओसाड परिसराचं बदललं चित्र
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पवनार परिसरात अन्नासाठी वानर मानवी वसतीत घुसून त्रास देत होते. यावर तरुणांनी एकत्र येत अनोखा उपाय केला आहे.
वर्धा, 6 सप्टेंबर: सध्याच्या काळात निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनलीय. अनेक ठिकाणी वृक्षतोडीमुळे वन्यजीव मानवी वसतीत हल्ले करण्याच्या घटनाही घडतात. यावर वर्धा जिल्ह्यातील पवनारच्या तरुणांनी एकत्र उपाय शोधून काढलाय. वानरांसह वन्यप्राणी अन्नाच्या शोधात मानवी वसतीत घुसतात आणि शेतीचं नुकसान करतात. यासाठी येत ओसाड माळरान असणाऱ्या नागटेकडी परिसरात श्रमदानातून वृक्षारोपण केलंय. आता या परिसरात फळबाग फुलणार असून वन्यजीवांना अन्नाचा प्रश्न मिटणार आहे.
जुन्या मंदिरामुळे नागटेकडी नाव
पवनार परिसरातील या टेकडीवर नागाचं जुनं मंदिर आहे. त्यामुळे या परिसराला नागटेकडी असं नाव पडलंय. हा परिसर ओसाड माळरान आहे. आता तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरातील तरुणांनी एकत्र येत वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केला. शनिवारी आणि रविवारी हे सदस्य नागटेकडीवर जाऊन वृक्ष लागवड करतात आणि फळझाडांची काळजी घेतात.
advertisement
या झाडांची लागवड
नागटेकडी परिसरात वन्य प्राणी आणि पक्षांचा विचार करून वृक्ष लागवड करण्यात आलीय. भविष्यात वन्यजीवांना, पक्षांना त्यांचा अधिवास आणि खाण्याकरिता अन्न मिळावे असा तरुणांचा उद्देश आहे. त्यासाठी नागटेकडी परिसरात आंबा, चिकू, जांभूळ, लिंब, मोसंबी, संत्रा, करवंत, सीताफळ, आवळा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली. या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संस्थेच्या सदस्यांनी घेतली आहे.
advertisement
श्रमदानातून होतेय वृक्षलागवड
संस्थेच्या माध्यमातून या वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपण मोहिमेत बहुसंख्य हात संस्थेची मदत करण्याकरीता पुढे सरसावले आहे. आठवड्यातील प्रत्येक रविवारी नागटेकडी परिसरात वृक्षलागवड आणि संगोपणाचे कामासाठी श्रमदानाच्या माध्यमातून बहुसंख्य हात एकत्र येत आहेत. या परिसरात वृक्ष लागवडीसोबतच कठडेही बसवले आहेत. सगळ्या झाडांना कठड्यांची गरज आहे त्यासाठी दानशूर व्यक्तींकडे मदतीचे आवाहनही करण्यात आलंय.
advertisement
संस्थेचा उपक्रम प्रेरणादायी
या झाडांचा फायदा माणसासोबतच पशु पक्ष्यांना होणार आहे. येणाऱ्या पिढीला या टेकडीवरील ही झाडे आनंद देणार आहेत. फळझाडांमुळे या टेकडीवर वेगळं नवचैतन्य दिसेल. त्यासाठी आजच्या काळातली तरुण पिढी मेहनत घेत आहे. संस्थेचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. म्हणूनच येणाऱ्या काहीच वर्षात ही प्रसिद्ध नागटेकडी हिरव्यागार झाडांसह विविध रसाळ फळांनीही बहरणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 06, 2023 9:14 AM IST