युवा शेतकऱ्यानं सुरू केला जोडधंदा, वर्षाकाठी तब्बल 22 लाखांची कमाई, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायातून दुहेरी फायदा मिळत आहे.
धाराशिव, 14 डिसेंबर: निसर्गावर आधारित असलेली शेती करताना शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकरी जोडधंदा करतात. धाराशिवमधील वाघोलीचे युवा शेतकरी निलेश काकडे यांनी 2016 साली कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. 140 पिलांपासून सुरू केलेला व्यवसाय आता दीड हजार कोंबड्यांवर पोहोचला आहे. यातून वर्षाकाठी 20 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं निलेश सांगतात.
शेतीला जोडधंदा म्हणून पाळल्या कोबंड्या
शेतीला जोडधंदा म्हणून निलेश यांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कोंबडीची 140 पिले आणली. त्यानंतर कोंबड्यांची संख्या वाढवत ती दीड हजारांवर पोहोचली. निलेश यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेर विक्रीसाठी पाठवल्या जातात. सध्या कोंबड्यांना जागेवरच 180 रुपये किलोचा दर मिळतोय. त्यामुळे वर्षाकाठी 20 ते 22 लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचं निलेश यांनी सांगितले.
advertisement
कोंबड्यांच्या खताचा वापर शेतीसाठी
निलेश यांच्याकडे वडिलोपार्जित साडेआठ एकर जमीन आहे. त्यामध्ये ते उसाचे उत्पन्न घेतात आणि या उसाला कुक्कूटपालनातून तयार झालेले कोंबड्यांचे खत वापरले जाते. शेतीसोबत जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या व्यवसायाने त्यांना भरभराटी मिळवून दिली. त्यासोबतच कोंबड्यांपासून मिळालेल्या खतामुळे शेतीच्या उत्पन्नात भर पडली, असेही ते सांगतात.
advertisement
काहीवेळा तोटा सहन करावा लागला
निलेश यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत असताना अनेक चढ-उतार पाहिले. काही वेळा त्यांना तोटाही सहन करावा लागला. परंतु कुक्कूटपालनाचा व्यवसाय त्यांनी बंद पडू दिला नाही. आता बाजार भाव चांगली आहे. उत्पन्न चांगले मिळतेय. व्यवसाय करीत असताना जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवावं लागतं. त्यामुळे चांगला नफा कमवता येऊ शकतो, असं निलेश सांगतात.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 14, 2023 2:51 PM IST