50 रुपये किलोचा कांदा थेट 15 रुपयांवर, निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी 45 ते 50 रुपये किलो विक्री होणारा कांदा आता 15 ते 20 रुपयांवर येऊन ठेपलाय.
धाराशिव, 18 डिसेंबर: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी 45 ते 50 रुपये किलो विक्री होणारा कांदा आता 15 ते 20 रुपये किलोवर येऊन ठेपलाय. निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलंय. या दरात खर्चही निघत नसल्याने शेकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कांद्याबाबत हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कांदा उत्पादनासाठी खर्च अधिक
कांदा पिकवण्यासाठी उत्पादन खर्च जास्त आहे. रोप तयार करण्यापासून कांदा लागवड, फवारणी, रासायनिक खत, त्याचबरोबर कांदा काढणी करून बाजारात विक्री करण्यापर्यंत एका एकरासाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री झाला तरच परवडतो. तरच शेतकऱ्यांना चार पैसे राहतात, असे धाराशिवमधील कांदा उत्पादक शेतकरी बालाजी पाटील सांगतात.
advertisement
सरकारने हमीभाव द्यावा
खरंतर कांद्याचे पीक सातत्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते. कारण होणारा खर्च आणि बाजारभाव यांच्यात मोठी तफावत असते. बाजारभावाची कुठली हमी नाही. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहत नाहीत. कांद्याच्या बाजारभावात होणाऱ्या चढउतारचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी पाटील यांनी केली आहे.
advertisement
निर्यात बंदीची गरज काय?
यंदा कांद्याला 45 ते 50 रुपये प्रतिकिलो पर्यंत भाव असल्याने चार पैसे मिळण्याची आशा होती. मात्र, सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यात बंदी करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. कुणाचीही मागणी नसताना निर्यात बंदी का केली? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी बालाजी पाटील यांनी सरकारला केला आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 18, 2023 2:56 PM IST