IndiGo च्या मुंबई-दिल्ली विमानात खळबळ, कॉकपिटमध्येच बेशुद्ध पडला पायलट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबई विमानतळावर इंडिगोच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. फ्लाइट 6E-6827 च्या पायलट कॉकपिटमध्येच बेशुद्ध पडला.
मुंबई : मुंबई विमानतळावर इंडिगोच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. फ्लाइट 6E-6827 च्या पायलट कॉकपिटमध्येच बेशुद्ध पडला. टेकऑफच्या अगदी आधी घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. शनिवार 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पायलटला खूप घाम येऊ लागला आणि काही मिनिटांतच त्याची प्रकृती बिघडली, अशी माहिती समोर आली आहे.
विमानतळावरील डॉक्टरांची एक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि पायलटची तपासणी करण्यात आली. सुदैवाने पायलटचा ईसीजी रिपोर्ट सामान्य आला. अन्नाच्या अॅलर्जीमुळे पायलटची प्रकृती बिघडल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. एअरलाइन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटला विश्रांतीसाठी रजेवर पाठवण्यात आलं आहे.
73 मिनिटे लेट झालं टेकऑफ
पायलट बेशुद्ध पडल्यामुळे विमानाच्या टेकऑफला 73 मिनिटे उशीर झाला. सुरुवातीला प्रवाशांना परिस्थितीची माहिती देण्यात आली नव्हती, पण नंतर एअरलाइन कर्मचाऱ्यांनी सांगितले की ऑपरेटिंग कॅप्टनच्या जागी दुसरा पायलट तैनात केला जात आहे. इंडिगोने या काळात प्रवाशांची माफी मागितली आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांची सुरक्षा आणि सुविधा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.
advertisement
प्रवाशांमध्ये घबराट
कॉकपिटमधून पायलट बेशुद्ध झाल्याची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये थोडीशी घबराट पसरली. पण, इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली आणि प्रवाशांना शांत केले. एका प्रवाशाने सांगितले की सर्वांना काळजी वाटत होती, पण एअरलाइनने वेळीच पर्यायी व्यवस्था केली.
एअरलाइनची प्रतिक्रिया
इंडिगोने म्हटले आहे की घटनेनंतर लगेचच वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. कंपनीने आश्वासन दिले की प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि नवीन कॅप्टन ड्युटीवर आल्यावरच विमान रवाना करण्यात आले. एअरलाइनने असेही म्हटले आहे की पायलटची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
advertisement
सुरक्षा प्रोटोकॉल काय आहे?
एव्हिएशन एक्सपर्ट्सच्या मते, उड्डाणादरम्यान किंवा त्यापूर्वी पायलटची प्रकृती बिघडल्यास नेहमीच बॅकअप प्लॅन तयार असतो. प्रत्येक फ्लाइटमध्ये एकापेक्षा जास्त पायलट असतात आणि एअरलाइन कंपन्यांकडे तात्काळ बदलीची व्यवस्था असते. म्हणूनच प्रवाशांना कोणताही मोठा उद्भवत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:27 PM IST