एप्रिल ठरणार तापदायक, राज्यात उष्णतेची लाट अन् अवकाळीचं संकट, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Mayuri Sarjerao
Last Updated:
आता एप्रिल महिनाही तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार गेला असून विदर्भात 42 अंशांचा टप्पा पार केलाय.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: राज्यात तापमान वाढीला लागले असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता एप्रिल महिनाही तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार गेला असून विदर्भात 42 अंशांचा टप्पा पार केलाय. दुसरीकडे हवामान विभागाने येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे. तर 6 ते 9 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. 5 एप्रिल रोजी राज्यातील तापमानाची स्थिती काय असेल ? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईतील कमाल तापमानात वाढ
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून तापमान 35 अंशांच्या खाली असलं तरी प्रचंड दमट हवामान मुंबईकरांना अनुभवयास मिळत आहे. 3 आणि 4 एप्रिल रोजी मुंबईतील कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस राहिलं. मात्र 5 एप्रिल रोजी कमाल तापमानात वाढ होऊन ते 34 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
पुण्यातील तापमान 40 अंशावर स्थिर
पुण्यातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. पुणेकरांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. 4 एप्रिल रोजी पुण्यातील तापमान 40 अंशावर राहणार आहे. तर 5 एप्रिल रोजी देखील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहणार आहे. सोबतच पुणे आणि परिसरात हवामान ढगाळ राहणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
advertisement
नाशिकमधील काही भागात पावसाची शक्यता
नाशिकमध्ये 4 एप्रिलप्रमाणेच 5 एप्रिल रोजी कमाल आणि किमान तापमान राहणार आहे. कमाल तापमान 38 तर किमान 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मात्र दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर 5 एप्रिलनंतर नाशिकमध्ये काही भागात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोल्हापुरात तापमान 40 वर जाणार
कोल्हापुरात तापमान 40 अंशाचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. 5 एप्रिल रोजी कोल्हापुरात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्येही हवामान कोरडं राहणार आहे.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्चमध्येच तापमानानं 40 अंशांचा टप्पा केला होता. तर एप्रिल महिन्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंशांवर पोहोचलं आहे. 5 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमधील तापमान 40 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे. शिवाय परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर 5 एप्रिलनंतर मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
विदर्भात तापमान उष्णतेची लाट
विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ होत आहे. कमाल तापमानसह किमान तापमान देखील वाढत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उपराजधानी नागपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. 5 एप्रिल रोजीही नागपुरातील कमाल तापमान हे 42 अंशांपर्यंतच राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
दरम्यान, राज्यात वाढत्या उष्णते सोबत पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला पुन्हा घोर लागून राहिला आहे. 5 एप्रिलनंतर हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. राज्यातील काही भागात गारपीटीसह पावसाची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2024 7:52 PM IST

