उद्धव दादूनंतर राज ठाकरेही धारावीसाठी मैदानात, मविआसह शिंदे सरकारला विचारला थेट सवाल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला आहे. महाविकास आघाडीला आज का जाग आली? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मुंबई, 18 डिसेंबर : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मविआने विशेषत: शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केलीय. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे दिल्याने त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चाही काढला. आता या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला आहे. महाविकास आघाडीला आज का जाग आली? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले आहेत. तसंच अदानींकडेच प्रकल्प का दिला असा प्रश्नही उपस्थित केला.
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे सोपवल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी मुंबईत मोर्चा काढला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. मोठा प्रकल्प मुंबईत येतो आणि तो मुळात परस्पर अदानींना का दिला? इथंपासूनच सुरुवात होते सगळ्याला. अदानींकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.
advertisement
टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी त्यांच्याकडूनही तुम्ही डिझाइन मागवायला पाहिजे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथं नेमकं काय होणार आहे ते कळायला हवं होतं, मात्र तसं झालं नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
advertisement
ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चावर टीका करताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, मला प्रश्न इतकाच आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले. पण आता का मोर्चा काढला? सेटलमेंट होत नाही का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी मोकळी जागा लागते, खूप मोठा भाग आहे. तिथं किती शाळा, कॉलेजेस होणार आहेत? रस्ते कसे होणार? इमारतीत माणसं किती राहणार हे सगळं सांगावं लागतं. टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट असते की नाही? असेही राज ठाकरे यांनी विचारले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2023 1:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
उद्धव दादूनंतर राज ठाकरेही धारावीसाठी मैदानात, मविआसह शिंदे सरकारला विचारला थेट सवाल