मासळी महागणार! गॅस पेट्रोलनंतर डिझेलचा भडका, मासेमारी व्यवसाय संकटात, काय घडतंय?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: देशभरातील मच्छीमार संस्थांना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात तब्बल 23 रुपयांची वाढ झाल्याने मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.
मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागला असून भारतातही त्याचे पडसाद उमटत आहेत. इंधनाच्या पुरवठ्यात झालेल्या अडचणींमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम होत असताना, याचा मोठा फटका आता मच्छीमार व्यवसायालाही बसू लागला आहे. आधीच महागाईच्या विळख्यात सापडलेल्या मच्छीमारांवर डिझेल दरवाढीमुळे अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे.
डिझेल दरवाढीचा मोठा फटका
देशभरातील मच्छीमार संस्थांना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात तब्बल 23 रुपयांची वाढ झाल्याने खोल समुद्रात जाणाऱ्या एका फेरीमागे सुमारे 40 ते 42 हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. एका बोटीला साधारण 2 ते 3 हजार लिटर डिझेल लागते. पूर्वी सुमारे 90 रुपये प्रति लिटर असलेला दर आता 114 रुपयांवर पोहोचल्याने मच्छीमारांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.
advertisement
आधीच वाढलेला साहित्य खर्च
युद्धामुळे मासेमारीसाठी लागणारे जाळे, शिसे आणि इतर साहित्य आधीच महाग झाले होते. त्यातच डिझेल दरवाढीची भर पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. कंझ्युमर कॅटेगरीत मच्छीमार संस्थांचा समावेश केल्याने त्यांना मोठ्या औद्योगिक ग्राहकांप्रमाणेच वाढीव दर लागू झाले असून याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होत आहे.
advertisement
राज्यातील मोठ्या मच्छीमार संस्थांकडून याला तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. मच्छीमार संस्थांना या कॅटेगरीतून तातडीने वगळण्याची मागणी होत असून, तोपर्यंत अनेक ठिकाणी डिझेल खरेदी टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही संस्थांनी तर तेल कंपन्यांचे टँकर परत पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याची परिस्थिती कायम राहिली तर मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढलेल्या खर्चामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले असताना, नव्या दरवाढीने मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मासळी महागणार! गॅस पेट्रोलनंतर डिझेलचा भडका, मासेमारी व्यवसाय संकटात, काय घडतंय?







