Mumbai Heat Wave: मुंबई तापली! 8 वर्षांतील सर्वाधिक तापमान, इथं उष्णतेचा उच्चांक!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Heat Wave: गेल्या आठ वर्षांनंतर मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला. पुढील 3 दिवस मुंबईत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई: यंदा फेब्रुवारी महिन्यातच मुंबईवर सूर्यदेवाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. उष्णतेने नवा उच्चांक गाठला असून सांताक्रूझ मध्ये तब्बल 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. गेल्या आठ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. तर राज्यात सर्वाधिक तापमान सांताक्रुझ येथे नोंदवलं गेलंय. मुंबईत याआधीही फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी उष्णतेची नोंद झाली आहे, पण यंदा तापमानाने नव्या विक्रमांना गवसणी घातली.
फक्त मुंबईच नाही, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या भागांतही सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार, पुढील दोन-तीन दिवस तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा बसत असल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते.
advertisement
फेब्रुवारीतच तापलं मुंबईचं रणरणतं उन्ह
गेल्या आठ वर्षांनंतर मुंबईत तापमानाने मंगळवारी (25 फेब्रुवारी) उच्चांक गाठला होता. पुढील 3 दिवस मुंबईत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
फेब्रवारीतील सर्वाधिक तापमान
25 फेब्रुवारी 1966 – 39.6 अंश सेल्सिअस (सर्वाधिक तापमान)
advertisement
22 फेब्रुवारी 2012 – 39.1 अंश सेल्सिअस
19 फेब्रुवारी 2017 – 38.8 अंश सेल्सिअस
23 फेब्रुवारी 2015 – 38 अंश सेल्सिअस
25 फेब्रुवारी 2025 – 38.7 अंश सेल्सिअस
उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका..!
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला अचानक कमजोरी जाणवू लागली, डोके दुखू लागले किंवा अंगात थकवा जाणवला, तर त्वरित सावलीत जावे आणि भरपूर पाणी प्यावे. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखी नैसर्गिक थंड पेये घेतल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शरीर थंड राहण्यास मदत होते. तसेच, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्या लोकांना आधीच आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उन्हामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Heat Wave: मुंबई तापली! 8 वर्षांतील सर्वाधिक तापमान, इथं उष्णतेचा उच्चांक!