सुस्साट प्रवासाची 'समृद्धी' ठरतेय मृत्यूचा सापळा, धक्कादायक आकडेवारी समोर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघांतांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असून ह महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. तर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील स्थिती जाणून घेऊ.
मुंबई: गेल्या वर्षभरामध्ये राज्यात अनेक गंभीर आणि लक्षवेधी रस्ते अपघात झाले आहेत. यात समृद्धी महामार्गावरील अनेक भीषण अपघातांचा समावेश आहे, ज्यामुळे या महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील अपघातांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये समृद्धी महामार्गावरील मृत्यू 16 टक्क्यांनी वाढले, तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मृत्यू 29 टक्क्यांनी घटले आहेत.
राज्य परिवहन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, समृद्धी महामार्गावरील मृत्यूंची संख्या गेल्या वर्षीच्या 92 वरून यंदा 107 वर, तर एक्सप्रेसवेवरील मृत्यू 72 वरून 51 वर आले आहेत.
तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांतील फरक
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही महामार्गांवरील परिस्थितीतील फरकाचे मुख्य कारण म्हणजे "Intelligent Traffic Management System (ITMS)". मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे आणि ITMS बसविण्यात आले आहेत, मात्र समृद्धी महामार्गावर अद्याप अशी व्यवस्था नाही.
advertisement
समृद्धी महामार्ग पूर्णपणे काँक्रीटचा असल्याने टायर फुटण्याच्या घटना जास्त, तर एक्सप्रेसवेवर काँक्रीट आणि बिटुमिनस मिश्रण असल्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग मऊ व टायरसाठी सुरक्षित आहे. तसेच, समृद्धी महामार्गाची लांब आणि सरळ रचना चालकांमध्ये "रोड हायप्नोसिस" निर्माण करते, ज्यामुळे एकसुरीपणामुळे झोप किंवा दुर्लक्ष होऊन अपघात वाढतात.
ट्रकचालकांसाठी सुविधांचा अभाव
सेव्ह लाईफ फाउंडेशनचे पियुष तिवारी यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ट्रकचालकांसाठी पुरेशा हॉल्ट आणि ले-बाय नसल्यामुळे ते पुलाखाली किंवा रस्त्याच्या कडेला वाहन थांबवतात, ज्यामुळे विशेषतः रात्री अपघातांचा धोका वाढतो. त्यातच काही ठिकाणी दरोडेखोर दगडफेक करून ट्रक थांबवतात, यामुळे घाबरलेल्या चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतात.
advertisement
‘समृद्धी’वर खबरदारी घेण्याची गरज
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मध्यभागी क्रॅश बॅरिअर, घाट विभागातील प्रकाशयोजना, पुलांचे संरक्षणभिंती व ड्रेनेज वॉल्स यांसारख्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे. तज्ज्ञ विवेक पै यांच्या मते, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोल प्लाझा (औरंगाबाद), कडवांची (जालना) आणि बुलढाणा ही अपघातप्रवण ठिकाणे आहेत. त्यातील बुलढाण्यातील भीषण बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता.
advertisement
भारतात चिंताजनक स्थिती
view commentsजागतिक स्तरावर दरवर्षी 12 लाख लोक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यातील 90% मृत्यू हे मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. भारतामध्ये 2024 मध्ये 4.73 लाख अपघात आणि 1.7 लाख मृत्यू नोंदवले गेले. महाराष्ट्रातही 2021 मधील 13,528 वरून 2024 मध्ये मृत्यूंची संख्या 15,715 वर गेली आहे. म्हणजेच सुरक्षित महामार्ग असूनही मानवी चूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्यांची रचना या त्रुटी अजूनही प्राणघातक ठरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 11:38 AM IST


