मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, राहुल गांधी यांच्यावर प्रचंड हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Election Commission Press Conference: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली.
नवी दिल्ली : आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी आहे, ना कुणी विरोधक आहे. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेद करीत नाही. परंतु काही लोक मतचोरीसारखे आरोप करून भारतीय संविधानचा अवमान करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तसेच मतदारांना निशाणा बनवून राजकारण केले जात असेल तर निवडणूक आयोग बेधडकपणे गरीब, श्रीमंत, ज्येष्ठ, महिला, तरूण, सगळ्या मतदारांच्या मागे पहाडासारखा उभा आहे, अशा शब्दात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावत सर्वधर्मीय मतदारांच्या मागे उभे असल्याचे सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांची फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेला विरोध करीत लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच बिहारमध्ये राहुल गांधी यांची 'मत अधिकार यात्रा'ही सुरू झाली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देत भूमिका स्पष्ट केली.
advertisement
त्रुटी असतील तर बदल नक्की सुचवा, निवडणूक आयोगाचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत
मुख्य आयुक्त निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार म्हणाले, राजकीय पक्षांच्या मागणीनुसारच बिहारमध्ये आम्ही मतदारयाद्यांची फेरतपासणी सुरू केली. त्याची सुरुवात बिहारपासून सुरू केली आहे. फेरतपासणीसाठी आम्ही एक आराखडा तयार केला आहे. मतदारांनी स्वत: २८३७० हरकती घेतल्या आहेत. प्रारूप मतदान यादी दिली आहे, त्यात काही त्रुटी वाटल्या तर आपल्या तक्रारी येत्या १५ दिवसांत नोंदवा, निवडणूक आयोगाचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले.
advertisement
राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल
राजकीय स्वार्थासाठी भ्रम पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतचोरीसारखे शब्द वापरून काही जण भारताच्या संविधानाचा अपमान करत आहेत. खोटे आरोप करताना मतदारांचे जाहीरपणे फोटो दाखविण्यात आले, जे फोटो दाखवायला सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. परंतु असल्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, मतदारही घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना निशाणा बनवून राजकारण केले जात असेल तर निवडणूक आयोग बेधडकपणे गरीब, श्रीमंत, ज्येष्ठ, महिला, तरूण, सगळ्या मतदारांसह पहाडासारखा उभा आहे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेऊन राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
August 17, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/देश/
मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, राहुल गांधी यांच्यावर प्रचंड हल्लाबोल