देशातील सगळ्यात स्वच्छ शहरातील सर्वात वाईट बातमी, दूषित पाण्यामुळे 8 लोकांचा गेला जीव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे ८ मृत्यू, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मदत जाहीर केली, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर काँग्रेसने टीका केली.
एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या शहरात मात्र स्मशानशांतता पसरली होती. इंदूरमधील भागीरथपुरा भागात मात्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात ड्रेनेजमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत होता. हे पाणी प्यायल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि बघता बघता एका आठवड्यात ६ महिलांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हादरून गेला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका निष्पाप नागरिकांना बसला आहे.
भागीरथपुरामधील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला. मात्र, सरकारी कागदपत्रात केवळ ३ मृत्यूंची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी बुधवारी ७ मृत्यू झाल्याच्या दाव्याची पुष्टी केली. नंदलाल पाल (७०), उर्मिला यादव (६०) आणि तारा कोरी (६५) यांसारख्या ज्येष्ठांना वेळेवर उपचार मिळूनही वाचवता आले नाही. आपल्या माणसांना गमावलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
advertisement
महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेचे कारण अत्यंत संतापजनक आहे. ज्या मुख्य जलवाहिनीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, तिथे एका ठिकाणी मोठी गळती (लीकेज) झाली होती. धक्कादायक म्हणजे, या गळती असलेल्या जागेच्या अगदी वर एका घराचे शौचालय बांधले होते. या शौचालयातील घाण पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये शिरले आणि तेच पाणी लोकांच्या घराघरात पोहोचले. यामुळेच हे पाणी केवळ दूषित नसून 'विषारी' बनले होते.
advertisement
इंदौर- दूषित पानी मामले में सियासत तेज, कांग्रेस ने लगाए गंभीर आरोप, वीडियो जारी कर लगाए गंभीर आरोप, मामला सामने आने के बाद भी आयोजन किए गए- कांग्रेस
| #indore | #breakingnews | #bjp | #congress | #mpnews | pic.twitter.com/zqGCUjs98z
— News18 MadhyaPradesh (@News18MP) December 31, 2025
advertisement
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर पावले उचलली आहेत. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या एका झोनल ऑफिसरला आणि एका असिस्टंट इंजिनिअरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, तर एका सब-इंजिनिअरची सेवा समाप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, आजारी असलेल्या सर्व रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे.
advertisement
या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. "हे इंदूरच्या प्रतिमेवर लागलेला डाग आहे. २२०० कोटी रुपये खर्च करूनही लोकांना विषारी पाणी प्यावे लागते, हे भ्रष्टाचारामुळेच घडले आहे," असा आरोप पटवारी यांनी केला. काँग्रेस प्रवक्त्यांनी तर प्रशासनावर मृत्यूचा खरा आकडा लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
advertisement
स्वच्छतेत अव्वल असणाऱ्या शहरात मूलभूत पिण्याचे पाणीही सुरक्षित मिळत नसेल, तर या 'स्वच्छते'चा काय उपयोग? असा सवाल आता सर्वसामान्य इंदूरकर विचारत आहेत. एका लीकेजने आणि प्रशासनाच्या डोळेझाक वृत्तीने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला आहे.
view commentsLocation :
Madhya Pradesh
First Published :
Dec 31, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
देशातील सगळ्यात स्वच्छ शहरातील सर्वात वाईट बातमी, दूषित पाण्यामुळे 8 लोकांचा गेला जीव











