...म्हणून पाकिस्तानचा बुरखा फाटला, कसाबच्या फाशीवेळी काय घडलं? उज्ज्वल निकमांचे काँग्रेसवर गंभीर आरोप
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
MP Ujjwal Nikam: जम्मू काश्मीरमध्ये झालेला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर अशा मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत उज्ज्वल निकम यांनी सहभाग नोंदवला.
नवी दिल्ली : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी सभागृहात आज पहिलेच भाषण केले. जम्मू काश्मीरमध्ये झालेला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर अशा मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत निकम यांनी सहभाग नोंदवला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबच्या फाशीच्या अनुषंगाने तत्कालिन काँग्रेस सरकारचे काय म्हणणे होते, हे सांगताना गंभीर आरोप केले.
तत्कालिन काँग्रेस सरकारला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी देण्याची घाई होती. मात्र या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे जगासमोर स्पष्टपणे आणण्यासाठी चौकशीची गरज होती, हे मी सरकारला स्पष्टपणे सांगितले. सरकारने कसाबविरोधात वेगवेगळे चार्जशीट दाखल करायला सांगितले होते. मात्र सरकारच्या मुद्द्याचे खंडन करून मुंबई पोलिसांना एकच चार्जशीट दाखल करण्याचे सुचविले. त्यानंतर खटला निकाली काढून दहशतवादामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे जगासमोर आणले, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
advertisement
अजमल कसाब याला लवकरात लवकर फाशी देऊन पाकिस्तानचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध तत्कालिन काँग्रेस सरकारला उघड होऊ द्यायचा नव्हता, असा गंभीर आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात केला. त्याउलट सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या दहशतवादाविरोधातल्या कूटनीतीचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
मी काँग्रेस सरकारचं ऐकलं नाही, एकच चार्जशीट दाखल केली, पाकचा बुरखा फाडला
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. इतर दहशतलवादी मारले गेले. त्याचवेळी अजमल कसाब हा मुंबई पोलिसांच्या जिवंत हाताला लागला. त्यावेळी मला सांगितलं गेले की कसाबविरोधात वेगवेगळे चार्जशीट दाखल करा, जेणेकरून लवकरात लवकर त्याला फाशी होईल. त्यावर मी तत्कालिन सरकारला असे सांगितले की आपण जर असे केले तर पाकिस्तानचा बुरखा आपण कधीच फाडू शकत नाही. आम्ही सरकारचे ऐकले नाही. मुंबई पोलिसांना सांगितले की कसाबविरोधात एकच चार्जशीट दाखल करा. एका वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण केली. इस्लामाबादला जाऊन आम्ही पाकिस्तानशी चर्चा केली. कट आपण रचला, पुरावे आम्हाला कसले मागता, असे आम्ही ठणकावले. पुरावे गोळा केले आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा जगासमोर फाडला, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
advertisement
मोदींच्या काळातल्या 'नव्या भारताचं' उज्ज्वल निकम यांच्याकडून कौतुक
पुढे २०१४ सत्ताबदल झाला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. डेव्हिड हेडलीबाबत मी त्यांना सांगितले, आम्ही हेडलीचा जबाब घेतला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, हे सिद्ध झाले. पाकिस्तान त्यावेळी भारताला गंभीरपणे घेत नव्हता. त्यांना हा विश्वास होता की दहशतवादाविरोधात भारत काही करू शकत नाही. पण तो जुना भारत होता. आताच्या नव्या भारतात त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले की केवळ फाईलमध्ये आम्ही अडकत नाही तर आगळीकीला चोख प्रत्युत्तर देतो. सहन करत नाही, आम्ही जशास तशी कारवाई करतो. पाकिस्तान आधी भारताला हलक्यात घेत होता, आता पाकिस्तान आपल्याला घाबरून असतो, यावरून मोदी सरकारचे विचार स्पष्ट होतात, असे निकम म्हणाले.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
July 29, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/देश/
...म्हणून पाकिस्तानचा बुरखा फाटला, कसाबच्या फाशीवेळी काय घडलं? उज्ज्वल निकमांचे काँग्रेसवर गंभीर आरोप


