तुम्ही कधी खाल्लंय का कवठ जाम? अलका यांनी उभारला व्यवसाय, महिन्याला 80000 कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या उपक्रमातून महिन्याला सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असून दोन महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. स्वतःच्या मेहनतीवर उभा केलेला हा व्यवसाय अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील म्हारोळा येथील अलका जाधव यांनी घरगुती पातळीवर सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाला आज चांगले यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या कवठ जाम आणि विविध घरगुती खाद्यपदार्थ तयार करून विक्री करत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून महिन्याला सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असून दोन महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. स्वतःच्या मेहनतीवर उभा केलेला हा व्यवसाय अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
अलका जाधव या सुरुवातीला डाळबट्टीसाठी लागणारे पीठ आणि इतर साहित्य विक्री करत होत्या. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी मुंबई येथे स्टॉल लावून साधे कवठ विकण्यास सुरुवात केली. पुढे संभाजीनगर परिसरातही कवठाची विक्री सुरू झाली. याच काळात काही ग्राहकांनी कवठापासून बनवलेले वेगळे पदार्थ देण्याची मागणी केली. त्या मागणीचा विचार करून त्यांनी कवठ जाम तयार करण्याचा प्रयोग केला आणि त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज हा कवठ जाम किराणा दुकाने, मॉल तसेच ऑनलाइन माध्यमातूनही विकला जात आहे.
advertisement
कवठ जामसोबतच चहा मसाला, घरगुती पितांबरी, विविध चटण्या, काळा व गरम मसाला, आमटीसाठी लागणारे मसाले असे अनेक पदार्थ त्या घरीच तयार करतात. या प्रक्रियेसाठी लागणारे कच्चे साहित्य आधी निवडून त्यावर प्रक्रिया केली जाते. मसाले भाजून घेतल्यानंतर गिरणीत दळले जातात आणि नंतर त्यांचे पॅकिंग घरीच केले जाते. या संपूर्ण कामात दोन महिलाही त्यांना मदत करतात. उत्पादनासाठी आवश्यक पॅकेजिंग मशीनचा वापरही त्या करत आहेत.
advertisement
अलका जाधव यांच्या मते, महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी अशा घरगुती उद्योगांकडे वळणे गरजेचे आहे. कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय घरची कामे सांभाळतही करता येतो. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरुवात करून अनुभव वाढवत नेल्यास या क्षेत्रात चांगला नफा मिळू शकतो. मेहनत आणि सातत्य असेल तर केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवता येते असे नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराची संधी देता येते, असे त्या सांगतात.
advertisement
ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून छोट्या उद्योगातून आर्थिक स्वावलंबन मिळवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलका जाधव यांचा कवठ जाम व्यवसाय होय. मेहनत, कल्पकता आणि ग्राहकांची गरज ओळखण्याची दृष्टी असेल तर छोटा उद्योगही मोठे यश देऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.









