Weather Alert: उत्तरेतून येतंय थंडीचं तुफान, महाराष्ट्रात पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. शुक्रवारी काही भागात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यभरात गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने घट होत असून, राज्यातील अनेक भागांत गारठा वाढला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने थंडीचा जोर काहीसा वाढलेला दिसतो. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि पालघर परिसरातील नागरिकांना हवामानातील हा बदल स्पष्टपणे जाणवत आहे. 26 डिसेंबर रोजी राज्यातील विविध भागांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात 26 डिसेंबर रोजी हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे. आकाश बहुतांश वेळा निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान सुमारे 30 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून, किमान 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. मागील काही दिवसांच्या तुलनेत किमान तापमानात सुमारे 1 ते 2 अंशांची घट झाल्याने सकाळी आणि रात्री गारवा अधिक जाणवेल. किनारपट्टी भागात पावसाची कोणतीही शक्यता नसली तरी सकाळच्या वेळेत हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
advertisement
पुणे शहरासह परिसरात आणि ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. पुण्यात किमान तापमान 10 ते 12 अंशादरम्यान राहण्याची शक्यता असून, कमाल 28 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात सुमारे 2 ते 3 अंशांची घट नोंदवली गेली आहे. सकाळच्या वेळेत थंडी बोचरी वाटेल, तर दिवसा ऊन असले तरी हवेत गारवा टिकून राहील. आसपासच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक जाणवणार असून शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भातील अंतर्गत भागांत 26 डिसेंबर रोजी थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात किमान तापमान 10 ते 14 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर विदर्भात काही ठिकाणी तापमान 8 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर आणि आसपासच्या भागांत सकाळच्या वेळेत थंडी अधिक जाणवेल. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा थेट परिणाम या भागांवर होत असल्याने गारठा वाढलेला दिसेल.
advertisement
एकंदरीत पाहता, 26 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हिवाळ्याचे वातावरण ठळकपणे जाणवेल. बहुतांश भागांत तापमान स्थिर राहण्याचा अंदाज असून, पुढील काही दिवस मोठा बदल अपेक्षित नाही. कोरडे हवामान, सकाळी धुके आणि थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हिवाळ्याची खरी अनुभूती येईल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.










