Weather Alert: कोकण किनारपट्टीवर दुहेरी संकट, रविवारी वादळी पाऊस, मुंबई-ठाण्यातही अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून कोकणात आज वादळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई ते सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने याच पार्श्वभूमीवर आज, म्हणजेच 26 ऑक्टोबर 2025 रोजीही येल्लो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असले तरी पावसाच्या या सरींनी दिलासा दिला आहे.
advertisement
मुंबईत काल सायंकाळी काही वेळासाठी जोरदार सरी कोसळल्या. आजही अशीच परिस्थिती राहणार आहे. दिवसभर वातावरण अंशतः ढगाळ राहील, तर दुपारनंतर काही भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी पडू शकतात. मुंबईचे आजचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दमट आणि उकाड्याचे वातावरण राहिल्यामुळे मुंबईकरांना उकाड्याला तोंड द्यावं लागणार आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हवामान खात्याने आज येल्लो अलर्ट दिला आहे. सकाळच्या सुमारास वातावरण कोरडे असले तरी दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि रिमझिम सरी पडत आहेत, तर काही ठिकाणी उकाड्याचा पारा वाढलेला आहे. कमाल तापमान 34 अंश आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते.
advertisement
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये आज पावसाचा जोर दिसून येतोय. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या, तर किनारपट्टीच्या भागात दमट आणि उकाड्याचं वातावरण कायम आहे. काही गावांमध्ये वीज चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि संध्याकाळी पुन्हा पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये जोरदार सरी पडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परिस्थिती सारखीच असून समुद्रकिनाऱ्याजवळील भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावलं आहे. अनेक ठिकाणी भातकापणी थांबवावी लागली असून ऑक्टोबरच्या अखेरीस पुन्हा पाऊस आल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.


