Mumbai Rain: मुंबईकर आज खोळंबा होणार! पाऊस धो धो कोसळणार, ठाण्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून कोकण परिसरात धो धो पाऊस सुरू आहे. आज मुंबई, ठाणे परिसराला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. 5 जुलै रोजी मुंबई महानगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण विभागात हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी अनेक भागांमध्ये रिमझिम ते मुसळधार सरी पडल्या असून, त्या पार्श्वभूमीवर आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
मुंबई शहरात शुक्रवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचे वातावरण होते, मात्र रात्रीच्या वेळेस काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. आज (5 जुलै) सकाळपासून वातावरण ढगाळ असून, दुपारनंतर पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे सत्र सुरू राहील. कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
advertisement
पालघरमध्ये शुक्रवारी सायंकाळी व रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती. काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी कोसळल्या. आज मात्र हवामान सौम्य राहण्याचा अंदाज असून, हलक्या पावसाचे सत्र सुरू राहील. डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड भागात शेतशिवारात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
कोकणात भात लावणीला सुरुवात झालीये, त्यामुळे पावसासाठी सगळेच आतुर आहेत. आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे प्रवास करणा-यांनी सतर्क राहावे.