Mumbai Rain: कोकणात मान्सूनचा जोर ओसरला, मुंबई, ठाण्यासाठी हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: महाराष्ट्रातील कोकणात गेल्या काही काळात जोरदार पाऊस सुरू आहे. आता मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होता. आता मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. शुक्रवारी दिवसभरात काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले, तर वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज 12 जुलै रोजी देखील पावसाची रिपरिप सुरूच राहणार असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी सुरु झाल्या आहेत. दुपारनंतर शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः दादर, सायन, अंधेरी, आणि घाटकोपर भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 20–30 किमी प्रतितास असेल, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सकाळी तापमान सुमारे 27 अंश असून दुपारी 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात सकाळी हलक्याशा सरी आणि ढगाळ वातावरणाने सुरुवात झाली. जव्हार, वसई, विरार, डहाणू परिसरात दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग थोडा वाढू शकतो, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
advertisement
कोकण विभागात आजही पावसाचे सत्र कायम राहणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत सखल क्षेत्रांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग भागात सायंकाळपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, पर्यटन स्थळे व समुद्रकिनारे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायगडच्या महाड आणि पोलादपूर या भागात विशेषतः पावसाचा जोर अधिक राहू शकतो.









