पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी हायअलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात कसं असेल आजचं हवामान
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही काळापासून पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचं धुमशान सुरू आहे. आज पुणे, साताऱ्यासह काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मागील 72 तासांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. साचलेले पाणी, वाहतूक कोंडी तसेच वीजपुरवठा खंडित झाला. मागील 24 तासात पुणे शहरामध्ये 40 मिलीमीटर तसेच चिंचवड 100, शिवाजीनगर 40 आणि कोरेगाव परिसरात 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तास देखील पुण्यासाठी जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मागील 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला. एप्रिल महिन्यात उष्णतेने तापलेला पारा आता मात्र 33 अंशापर्यंत घटला आहे. मागील 24 तासात साताऱ्यात तब्बल 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तास देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसातची शक्यता असून सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीमध्ये अंशतः वाढ झाली आहे. वादळीवारण झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. कोल्हापुरात 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस असून पुढील 24 तास देखिल गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात मागील 24 तासात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिली. सांगलीमध्ये 24 मिलीमीटर तसेच शिराळ्यात 40 तसेच कवठेमहांकाळ आणि कसबेडिग्रज परिसरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
advertisement
वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. बागायती शेतीची कामे खोळंबली आहेत. मात्र जिरायत शेतीला पेरणीसाठी अवकाळी पाऊस पोषक ठरत आहे. मात्र "शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये. गडबडीने पेरणी केल्यास विविध रोगाची लागण झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. मृग नक्षत्राच्या पावसानंतरच पेरणी करावी." असे आवाहन कृषी विभागाचे अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.







