श्रावणात संकष्टी चतुर्थीचे महत्त्व मोठे, बाप्पाचे कृपेने इच्छा होईल पूर्ण, आधी जाणून घ्या, नेमकं कसं कराल व्रत?
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत मानले जाते. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली गेली आहे. चातुर्मासातील श्रावण मासात व्रत-वैकल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थी व्रतपूजन आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे आज जाणून घेऊयात.
गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत मानले जाते. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते.
advertisement
कान्हासाठी यशोदा मातेने केले होते हे व्रत -
भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते, हे सर्वश्रुत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते.
बहुला चतुर्थी व्रत अन् श्रीकृष्ण पूजन -
या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे.
advertisement
श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे कराल -
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत.
advertisement
‘मिलेट्सचे ताट, आरोग्याचा थाट’ स्लोगनची सर्वत्र चर्चा, साताऱ्यातील महिलेची ती कल्पना अन् आज लाखोंची कमाई, VIDEO
धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.
advertisement
श्रावण संकष्ट चतुर्थी: गुरुवार, 22 ऑगस्ट 2024
श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01 वाजून 46 मिनिटे
श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजून 38 मिनिटे.
सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने 22 ऑगस्ट रोजी व्रताचरण करावे. बाप्पाची कृपा राहून इच्छा पूर्ण होतात, असे ज्योतिषी राजेश जोशी यांनी सांगितले.
advertisement
सूचना - वर दिलेली माहिती ही आचार्य, ज्योतिषी यांच्या साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 21, 2024 12:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
श्रावणात संकष्टी चतुर्थीचे महत्त्व मोठे, बाप्पाचे कृपेने इच्छा होईल पूर्ण, आधी जाणून घ्या, नेमकं कसं कराल व्रत?







