पाणी प्यायला गेला, घोट घेण्यापूर्वीच मृत्यूची झडप, पुण्यातील विद्यार्थ्यासोबत घडलं आक्रीत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित विद्यार्थी पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टरकडे गेला होता. मात्र पाण्याचा घोट घेण्याआधीच त्याच्यावर मृत्यूने झडप घातली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
चैतन्य चव्हाण असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी (डोंगरगाव) येथील रहिवासी होता. तो पुण्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील वॉटर फिल्टरमधून पाणी घेत असताना चैतन्यला अचानक जोरदार विजेचा धक्का लागला. शॉक लागताच तो जागीच कोसळला.
advertisement
या घटनेनंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांनी तातडीने धाव घेत चैतन्यला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चैतन्यच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. एका होतकरू तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन
advertisement
या घटनेनंतर कृषी महाविद्यालयातील वातावरण चांगलंच तापलं आहे. वसतिगृहातील सोयी-सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच चैतन्यचा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. "महाविद्यालयाने या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी," या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पाणी प्यायला गेला, घोट घेण्यापूर्वीच मृत्यूची झडप, पुण्यातील विद्यार्थ्यासोबत घडलं आक्रीत







