प्रेमविवाहानंतर सुखी संसारात तिसरीची एन्ट्री; पत्नीला 'वाऱ्यावर' सोडणं पुण्यातील पोलिसाला भोवलं, थेट गजाआड पोहोचला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोशल मीडियाच्या माध्यमातून रमेशच्या आयुष्यात दुसरी महिला आली आणि सुखी संसाराला नजर लागली. अनैतिक संबंधांमुळे रमेशने पत्नी आणि मुलाला सोडून दिले.
पुणे: पोलिसांना जनतेचे रक्षक मानले जाते, पण कौटुंबिक जबाबदारी आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यावर कायदा कुणालाही सोडत नाही. हे पुण्यातील एका घटनेने सिद्ध झाले आहे. आपल्या पत्नीला आणि मुलाला पोटगी न देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला न्यायालयाने तब्बल १२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २ लाख ४० हजार रुपयांची पोटगी थकवल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरानपल्ले यांनी हा कडक आदेश दिला.
प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सरिता आणि रमेश (नावे बदललेली) यांचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगाही झाला. लग्नानंतर रमेश पोलीस दलात भरती झाला आणि त्यांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून रमेशच्या आयुष्यात दुसरी महिला आली आणि सुखी संसाराला नजर लागली. अनैतिक संबंधांमुळे रमेशने पत्नी आणि मुलाला सोडून दिले. सरिताने वारंवार विनवणी करूनही रमेशने त्याकडे लक्ष दिले नाही.
advertisement
यानंतर कंटाळून सरिताने अॅड. नीता भवर यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने अंतरिम पोटगी सुरू केली, पण रमेशने एकाही तारखेला हजर न राहता न्यायालयाचा अवमान केला. अखेर अॅड. भवर यांनी 'पकड वॉरंट'चा अर्ज दिल्यावर न्यायालयाने रमेशला थेट २७ मार्च २०२७ पर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. "पैसे भरले तरच सुटका, अन्यथा जेल" अशा स्पष्ट आदेशामुळे रमेशची रवानगी तुरुंगात झाली.
advertisement
तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर त्याच्या वकिलांनी तातडीने थकीत २ लाख ४० हजार रुपये भरले. रक्कम जमा झाल्यावर अॅड. भवर यांनी 'ना हरकत' दिल्याने त्याची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात आणि कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 7:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रेमविवाहानंतर सुखी संसारात तिसरीची एन्ट्री; पत्नीला 'वाऱ्यावर' सोडणं पुण्यातील पोलिसाला भोवलं, थेट गजाआड पोहोचला







