Makar Sankranti: मकर संक्रांती का साजरी केली जाते? धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक कारण, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Makar Sankranti 2026: धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीपासून शुभ काळाची सुरुवात होते. या दिवसापासून सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे प्रवास सुरू करतो.
छत्रपती संभाजीनगर: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या घटनेला संक्रांत असे म्हटले जाते. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणजेच मकर संक्रांत. एका संक्रांतीपासून पुढील संक्रांतीपर्यंतचा कालावधी सौर महिना मानला जातो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो आणि याच घटनेचे स्वागत देशभर वेगवेगळ्या पद्धतीने उत्सवाच्या रूपात केले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीपासून शुभ काळाची सुरुवात होते. या दिवसापासून सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे प्रवास सुरू करतो. देवतांचा दिवस याच काळात सुरू होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म आणि पूजाअर्चा विशेष फलदायी ठरतात, असे मानले जाते. याच कारणामुळे ‘या दिवशी स्वर्गाचे द्वार उघडते’ अशी लोकधारणा आहे.
advertisement
पौराणिक कथा
मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप, वस्त्र आणि गरजूंना दान केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पौराणिक कथांनुसार महाभारत काळात भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी उत्तरायणाचा, म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेतही उत्तरायणात आणि शुक्ल पक्षात देहत्याग केल्यास मुक्ती प्राप्त होते, असा उल्लेख आढळतो. त्यामुळे हा दिवस आनंद, उत्साह आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
advertisement
सूर्यदेव आणि शनि कथा
पौराणिक कथांमध्ये सूर्यदेव, शनी आणि छाया यांच्यातील कथेला विशेष महत्त्व आहे. कथेनुसार सूर्यदेव आणि शनी यांच्यात वैर निर्माण झाले होते. या संघर्षातून अनेक घटना घडल्या आणि शनी व त्यांची माता छाया यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अखेरीस सूर्यदेवांनी शनी मकर राशीत प्रवेश केल्यावर त्याच्या जीवनात समृद्धी येईल, असे वरदान दिले. त्यावर शनी प्रसन्न झाले आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजा करणाऱ्यांना शनीदोषाचा त्रास होणार नाही, अशी कृपादृष्टी त्यांनी दिली, अशी श्रद्धा आहे.
advertisement
वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व
धार्मिक कारणांबरोबरच मकर संक्रांतीला वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्वही आहे. सूर्य उत्तरायण झाल्याने हवामानात हळूहळू बदल सुरू होतात. कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळू लागतो आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
भारत कृषिप्रधान देश असल्याने सण-उत्सवांचा थेट संबंध शेतीशी जोडलेला आहे. याच काळात शेतकरी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण करून खरीप हंगामातील पीक घरी आणतात. त्यामुळे घराघरात धान्य, तिळगूळ, ऊस, मका अशा पदार्थांची रेलचेल असते. याच समृद्धीचे प्रतीक म्हणून मकर संक्रांतीला तिळगूळ, उसाची गाठी, सुगडी आणि विविध पारंपरिक पदार्थांची देवाणघेवाण केली जाते. एकमेकांशी गोड बोलण्याचा संदेश देत हा सण सामाजिक ऐक्य आणि सकारात्मकतेचा उत्सव ठरतो.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 12:10 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti: मकर संक्रांती का साजरी केली जाते? धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक कारण, Video






