Mahabharat : कृष्णाची द्वारका का बुडाली?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabharat Story : पुराणांमध्ये असं म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णाने मथुरा सोडली आणि समुद्रकिनाऱ्यावर द्वारका नावाचं एक अद्भुत शहर स्थापन केलं. पण महाभारत युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपलं मानवी रूप सोडलं, तेव्हा हे शहर समुद्रात बुडालं.
नवी दिल्ली : हिंदू धर्मातील चार पवित्र स्थळांपैकी एक असलेलं द्वारका धाम हे भगवान श्रीकृष्णाचं शहर असल्याचं म्हटलं जातं. गुजरातमधील काठियावाड प्रदेशात अरबी समुद्राजवळ द्वारका धाम आहे. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका शहराच्या पाण्यात बुडाल्याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. याशिवाय पंडित आणि इतिहासकारांनी काय सांगितलं आहे पाहुयात.
द्वारका भगवान श्रीकृष्णाने वसवलेलं शहर. पुराणांमध्ये असं म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णाने मथुरा सोडली आणि समुद्रकिनाऱ्यावर द्वारका नावाचं एक अद्भुत शहर स्थापन केलं. पण महाभारत युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपलं मानवी रूप सोडलं, तेव्हा हे शहर समुद्रात बुडालं. असं मानलं जातं की महाभारतानंतर 36 वर्षांनी द्वारका समुद्रात बुडाली. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी सांगितलं की, भगवान श्रीकृष्णाची द्वारका बुडण्याची दोन मुख्य कारणं जबाबदार असल्याचं मानलं जातं.
advertisement
एक गांधारीचा शाप
पौराणिक कथेनुसार जरासंधाने आपल्या प्रजेवर केलेले अत्याचार थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण मथुरा सोडून गेले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर एक दिव्य नगरी स्थापन केली, ज्याचं नाव द्वारका ठेवलं.महाभारतात पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा नाश झाला.
नंतर जेव्हा हस्तिनापुरात युधिष्ठिराला राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा कृष्ण उपस्थित होता. त्यानंतर गांधारीने महाभारत युद्धासाठी भगवान श्रीकृष्णाला दोषी ठरवलं आणि त्यांना शाप दिला की, "जर मी खरोखर माझ्या देवतेची पूजा केली असेल आणि पत्नी म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं असेल, तर जसं माझं कुळ नष्ट झालं तसंच तुमचं कुळही तुमच्या डोळ्यांदेखत नष्ट होईल." असं म्हटलं जातं की या शापामुळे भगवान श्रीकृष्णाचं द्वारका शहर पाण्यात बुडाले.
advertisement
दुसरं कारण ऋषींचा शाप
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, एकदा महर्षी विश्वामित्र, देव ऋषी नारद, कण्व द्वारकेला गेले, तेव्हा यादव वंशातील काही मुलांनी ऋषींची थट्टा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला एका स्त्रीच्या वेशात नेलं. त्यांनी ऋषींना सांगितलं की ही स्त्री गर्भवती आहे. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल सांगा, काय जन्माला येईल? स्वतःचा अपमान होत असल्याचं पाहून ऋषींनी शाप दिला की तिच्या पोटातून एक मुसळ जन्माला येईल आणि तो मुसळ संपूर्ण यदुवंशी वंशाचा नाश करेल.
advertisement
त्यानंतर, सर्व यदुवंशी आपापसात लढू लागले आणि मरू लागले. सर्व यदुवंशींच्या मृत्युनंतर बलरामानेही आपलं शरीर सोडलं. एका शिकारीने श्रीकृष्णाला हरण समजून त्यांच्यावर बाण सोडला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान जेव्हा पांडवांना द्वारकेतील दुर्घटनेची माहिती मिळाली, तेव्हा अर्जुन ताबडतोब द्वारकेला गेला आणि भगवान श्रीकृष्णाच्या उर्वरित कुटुंबातील सदस्यांना आपल्यासोबत इंद्रप्रस्थला घेऊन गेला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण द्वारका शहर रहस्यमयपणे समुद्रात बुडालं.
advertisement
इतिहासकार काय सांगतात?
न्यूज18मराठीच्या पॉडकास्टमध्ये इतिहासकार निलेश ओक यांनीही द्वारकेबाबत माहिती दिली आहे. निलेश ओक म्हणाले, द्वारका खूप समृद्ध झाली होती. पण असं म्हणतात ना की एखादा वंश समृद्ध असेल पण त्यांची मुलं नीट नसतील तर ते बिघडतं, तसंच पूर्ण यदुवंशाचं झालं होतं. त्यांच्यामध्ये उन्मत्तपणा आला. कृष्ण बघत आहेत. पण आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेली जी डिटॅचमेंट आहे ना तीसुद्धा त्यांनी बाळगली. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. पण ते झालं नाही आणि जेव्हा त्यांनी पाहिलं ते एकमेकांना मारायला लागले. मग दुसरं कुणीतरी येण्यापेक्षा मीच तो वंश संपवतो, असं त्यांनी ठरवलं.
advertisement
आणि त्यांनी असंसुद्धा सांगितलं की द्वारका आहे ती समुद्राच्या पाण्याने अचानक जाणार. त्यांना हे कशामुळे समजलं ते आपल्याला माहिती नाही. त्यांचा तोही अभ्यास असेल. पण यानंतर त्यांनी अर्जुनाला निरोप पाठवला की माझं अवतार कार्य आता संपत आलं आहे. तू इथं ये आणि इथल्या यदू स्त्रिया आहेत त्यांचं संरक्षण करून त्यांना तू घेऊन जा. म्हणजे त्यांची अरेंजमेंटही त्याने करून ठेवली होती आणि शेवटी शांत, उदिग्न मनाने ते द्वारकेच्या बाहेर जाऊन बसले होते आणि त्यावेळी त्यांना तो बाण लागला.
Location :
Delhi
First Published :
September 30, 2025 5:45 AM IST