तुकाराम बीजेला दुपारी 12 वाजता देहूमध्ये नांदुरकीचे झाड का हलते? लाखो भाविक आहेत या चमत्काराचे साक्षीदार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वारकरी संप्रदायामध्ये 'तुकाराम बीज' हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते. या दिवशी पुणे जिल्ह्यातील देहू येथे इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या 'वैकुंठगमन' मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
Tukaram Beej 2026 : वारकरी संप्रदायामध्ये 'तुकाराम बीज' हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते. या दिवशी पुणे जिल्ह्यातील देहू येथे इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या 'वैकुंठगमन' मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी मंदिराच्या आवारातील नांदुरकीचे झाड अचानक हलू लागते. लाखो भाविक या चमत्काराचे साक्षीदार होतात. यामागे नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात.
सदेह वैकुंठगमनाचा प्रसंग
मान्यता अशी आहे की, 1649 साली तुकाराम महाराज याच नांदुरकी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. विठ्ठलाने त्यांना वैकुंठाला नेण्यासाठी 'गरुड' पाठवला होता. दुपारी 12:02 च्या सुमारास महाराज सदेह विमानात बसून वैकुंठाला गेले. ज्या क्षणी महाराज वैकुंठाला झेपावले, त्या क्षणी निसर्ग आणि त्या वृक्षाने दिलेली ती एक साक्ष मानली जाते. आजही त्याच तिथीला आणि त्याच वेळेला त्या घटनेची 'पुनरावृत्ती' किंवा 'स्मरण' म्हणून हे झाड हलते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
advertisement
आध्यात्मिक ऊर्जेचे प्रकटीकरण
अध्यात्मिक अभ्यासकांच्या मते, देहूतील हे स्थान अत्यंत ऊर्जावान आहे. तुकाराम महाराजांचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा होता की, त्यांचे वैकुंठगमन ही एक अलौकिक घटना होती. नांदुरकीचा वृक्ष हा या ऊर्जेचा केंद्रबिंदू बनला आहे. तुकोबांच्या अस्तित्वाची आणि चैतन्याची जाणीव करून देणारा हा क्षण असतो, असे मानले जाते.
निसर्गाची सहसंवेदना
संतांचे आणि निसर्गाचे नाते अतूट असते. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या विरहाने किंवा त्यांच्या वैकुंठगमनाच्या आनंदाने आजही निसर्ग त्या विशिष्ट क्षणी प्रतिसाद देतो, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. जेव्हा आजूबाजूला वारा नसतानाही केवळ त्या एका वृक्षाची पाने हलतात, तेव्हा भाविक "ज्ञानबा-तुकाराम" चा जयघोष करतात.
advertisement
यंदाच्या तुकाराम बीजेचे महत्त्व
यंदा गुरुवारी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी तुकाराम बीज साजरी केली जात आहे. 5 मार्च रोजी दुपारी 12:02 वाजता हा सोहळा पार पडेल. जे भाविक देहूला जाऊ शकत नाहीत, ते घरीच दुपारी 12 वाजता तुकाराम महाराजांच्या गाथेची किंवा प्रतिमेची पूजा करून नामस्मरण करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 3:39 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुकाराम बीजेला दुपारी 12 वाजता देहूमध्ये नांदुरकीचे झाड का हलते? लाखो भाविक आहेत या चमत्काराचे साक्षीदार









