Holi 2024: होळी, धुळवड आणि धूलिवंदन यामध्ये काय आहे फरक?
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Holi 2024: महाराष्ट्रातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिकावंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे.
मुंबई : आजकाल होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळायला सुरुवात झाली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, होळी, धुळवड आणि धूलिवंदन यात नेमका काय फरक आहे? उत्तर भारतीय परंपरा नकळतपणे मराठी माणसांनी स्वीकारल्याने पूर्वापार चालत आलेली खरी रंगपंचमी. जाणून घेऊया होळी, धुळवड आणि रंगपंचमी यांचे वास्तविक महत्त्व..
होळी कधी असते?
होळी अर्थात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी भक्तश्रेष्ठ प्रल्हादला भक्ती सिद्ध करण्याचे आव्हान देण्यात आले होते. प्रल्हादाची आत्या होलिकेला अग्नीपासून अभयाचे वरदान होते. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन पेटवून घेतले. अशा कठीण परिस्थितीतही प्रल्हादाची भक्ती डळमळीत झाली नाही. विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हादाचे रक्षण केले आणि वाईट प्रवृत्तीच्या होलिकेचे त्या अग्नीमध्ये दहन झाले. तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहनाची प्रथा पाळली जाते. होळी अर्थात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जाते.
advertisement
धुलिकावंदन किंवा धुळवड म्हणजे काय?
महाराष्ट्रातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिकावंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे. परंतु आजकाल अनेकांना धुलिकावंदन अर्थात धुळवड म्हणजे काय हे माहीत नसते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. याला धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात.
advertisement
धुलीवंदन म्हणजे वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. अग्नी प्रजव्लित करून त्याचा धूर केल्याने वातावरण शुद्ध होते अशी भावना आहे. होळीत अन्न पदार्थाचा समावेश करतात, विशेषत: पुरणपोळीसारख्या पक्वान्नांची त्यात आहुती देतात.
advertisement
रंगपंचमी केव्हा असते?
फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. परंतु उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आहे. आजकाल मराठी सण विसरून अनेक जण सर्रासपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे आजकाल महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जात आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2024 12:12 PM IST







