Mohammed Shami : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या शमीला समन्स, तातडीने हजर राहण्याचे आदेश!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेला मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाला समन्स बजावण्यात आलं आहे.
कोलकाता : मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेला मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाला समन्स बजावण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक आयोगाने अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष सघन पुनरावलोकन (SIR) सुनावणीसाठी समन्स बजावले आहेत. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीलाही SIR सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या (KMC) वॉर्ड क्रमांक 93 मधील तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक मौसमी दास यांनी शमीला सुनावणीची सूचना मिळाल्याची पुष्टी केली. शमीचा जन्म उत्तर प्रदेशात झाला होता, पण तो दक्षिण कोलकात्यातील जाधवपूर विधानसभा मतदारसंघात दीर्घकाळ मतदार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीला त्याच्या जनगणनेच्या फॉर्मशी संबंधित गुंतागुंतीमुळे सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. शमी सोमवारी सुनावणीसाठी उपस्थित राहणार होता पण क्रिकेटच्या व्यस्ततेमुळे तो उपस्थित राहू शकला नाही. तो सध्या राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे आणि नंतर सुनावणीमध्ये सामील होईल. केवळ शमीच नाही तर त्याच्या भावालाही सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
advertisement
मोहम्मद शमी त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार खूप लहान वयात उत्तर प्रदेशमधून कोलकात्याला गेला. त्याने क्रिकेट प्रशिक्षक संबरन बॅनर्जी यांचे लक्ष वेधले आणि बंगाल अंडर-22 टीममध्ये स्थान मिळवले. यातूनच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. तो मोहन बागान क्रिकेट कपमध्येही खेळला.
शमीचा धमाका
मोहम्मद शमी हा मागच्या काही काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने भेदक बॉलिंग केली आहे, पण तरीही त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही शमीची भारतीय टीममध्ये निवड होत नसल्यामुळे वाद निर्माण झाला. तसंच मागच्या काही दिवसांमध्ये मोहम्मद शमी आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यातही खटके उडाले.
advertisement
शमी-आगरकर वाद
शमी निवडीसाठी फिट नसल्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर टीम इंडियाकडून खेळला नसल्याचं अजित आगरकर म्हणाला होता. अजित आगरकरच्या या दाव्यावर मोहम्मद शमीने पलटवार केला. 'निवड समितीने मला कोणतीही अपडेट दिली नाही. मी फिट नसतो तर दुलीप ट्रॉफी आणि बंगालकडून रणजी ट्रॉफी कशी खेळले असतो?' असं शमी म्हणाला. यावर मी खेळाडूंसोबत संपर्कात असतो आणि माझा मोबाईलही नेहमी सुरू असतो, असं प्रत्युत्तर अजित आगरकरने दिलं होतं.
advertisement
अपडेट देणे किंवा मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणं हे माझं काम नाही. माझं काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता, यानंतर अजित आगरकरनेही प्रतिक्रिया दिली. आपलं शमीसोबत मागच्या काही महिन्यात अनेकवेळा बोलणं झालं आहे. मेडिकल टीमला तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट नसल्याचं वाटत आहे, असा दावा अजित आगरकरने केला.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
Jan 05, 2026 10:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohammed Shami : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या शमीला समन्स, तातडीने हजर राहण्याचे आदेश!










