Suryakumar Yadav : 'मुंबईत लहानाचा मोठा झालो, इथेच राहणार', वर्ल्ड चॅम्पियन सूर्याभाऊची अस्सल मराठी मुलाखत!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर सूर्यकुमार यादव याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर सूर्यकुमार यादव याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईमध्ये दाखल होताच सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच मराठीमध्ये मुलाखत दिली आहे. ज्यात त्याने मुंबईमधून सुरू झालेला प्रवास ते टी-20 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
'ट्रॉफी जिंकून 48 तास झाले आहेत, खूप जोरदार माहोल आहे. शेजारचे कॉल करून विचारत होते, कधी येणार? बायको पण कधी येणार आहेस, म्हणून विचारत होती. मनात खूप भावना दाटून आल्या आहेत. वर्ल्ड कप जिंकल्याची भावना खूप भारी आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
'2024 ला टी-20 वर्ल्ड कप जिंकलो होतो, त्यावेळी मी टीमचा भाग होतो. पुढे मला टीमचा कॅप्टन करण्यात आलं. योगायोगाने भारतामध्येच टी-20 वर्ल्ड कप झाला, यावेळी वर्ल्ड कप जिंकायचा, हे ठरवलं होतं. आम्ही खूप मेहनत घेतली, टीम एकत्र बांधली, प्लानिंग केलं आणि त्यानुसार खेळलो. त्याचा रिझल्ट देशाने पाहिला', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.
advertisement
'अहमदाबादच्या खेळपट्टीवरची माती मी कपाळाला लावली. आपली जन्मभूमी आहे, त्या विकेटवर आम्ही खेळतो, त्याचाच मान नाही ठेवला तर कसं चालणार? रन्स झाले किंवा नाही झाले. ती वेगळी गोष्ट पण ज्या विकेटवर आम्ही खेळलोत, तिचा सन्मान करायला हवा. त्याच उद्देशातून मी खेळपट्टीला नमन केलं', असं वक्तव्य सूर्याने केलं आहे.
चेंबूरमध्ये राहतो, पुढेही इथेच राहणार
advertisement
'चेंबूरपासून माझा प्रवास सुरू झाला. मी इथल्या मैदानावर खेळलो, बीएसईमध्ये राहायचो. आताही इकडेच राहतो, पुढेही कुठे जाणार नाही. मी आज निवांत झोपलो, दोन दिवस अजिबात झोप झाली नव्हती. आताही चेंबूरला यायचं म्हटल्यावर जरा आराम केला. इकडे आल्यावर जोरदार स्वागत होईल, याची कल्पना होतीच, त्यामुळे एनर्जी सेव्ह केली', असं सूर्याने सांगितलं.
advertisement
'टीममधील माझे सहकारी खेळाडू खूपच चांगले खेळले. आम्ही टुर्नामेंटमध्ये मागे वळून पाहिलेच नाही, प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहिती होती, त्यामुळे कुणालाही काही नवं सांगण्याची गरज पडली नाही', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
बॅट नव्हती, शूजही नव्हते
'कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलं, मी जेव्हा घरी येतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो, तेव्हा क्रिकेटबद्दल आम्ही फार बोलत नाही, कारण क्रिकेटबद्दल बोलायला बाहेर लोक आहेत. ते आम्हाला मदतही करत असतात. घरच्यांनी खूप सपोर्ट केलाय', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं.
advertisement
'अशोक सर माझे कोच होते, त्यांनी मला खूप पुश केलंय. माझ्याकडे बॅट नव्हती, माझ्याकडे शूज नव्हते, त्यावेळी ते मला ग्राऊंडवर बोलवायचे. सिनिअर खेळाडूंमध्ये मला खेळायला संधी द्यायचे, कारण मी लवकर शिकावं, माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे', असं म्हणत कॅप्टन सूर्याने त्याच्या कोचचीही आठवण काढली.
आमचं पुढचं लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे, त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आमच्याकडे असेल, या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 6:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 'मुंबईत लहानाचा मोठा झालो, इथेच राहणार', वर्ल्ड चॅम्पियन सूर्याभाऊची अस्सल मराठी मुलाखत!






