Success Story: तुझी लायकी काय? सहशिक्षिकेनं सुनावलं, नवऱ्यानेही दिला अल्टिमेटम अन् आरती गुप्ता झाल्या अधिकारी

Last Updated:

Success Story: आरती यांचा प्रवास लहानपणापासूनच संघर्षाचा होता. घरून शाळेत जाण्यासाठी ५ किलोमीटरची पायपीट आणि पुढे १० किलोमीटरचा सायकल प्रवास.

News18
News18
"तुझी लायकी काय?" हे शब्द एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात किंवा त्याच आयुष्याला जिद्दीची नवी उभारी देऊ शकतात. रायबरेलीच्या आरती गुप्ता यांच्या बाबतीत हे दुसरे विधान तंतोतंत खरे ठरले. संसाराचा गाडा ओढता ओढता, अपमान पचवून आणि पोटच्या मुलांचे अश्रू पाहूनही आरती यांनी हार मानली नाही. आज त्याच आरती गुप्ता उत्तर प्रदेश सरकारमध्ये PCS अधिकारी म्हणून दिमाखात वावरत आहेत.
सायकलवर सुरू झालेला प्रवास
आरती यांचा प्रवास लहानपणापासूनच संघर्षाचा होता. घरून शाळेत जाण्यासाठी ५ किलोमीटरची पायपीट आणि पुढे १० किलोमीटरचा सायकल प्रवास. हिंदी माध्यमाची सरकारी शाळा आणि घरची जबाबदारी पेलत त्यांनी बीटीसी (BTC) कोर्स पूर्ण केला आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर लवकर लग्न झाले आणि संसारात दोन मुलांची जबाबदारी आली. एका शिक्षिकेची नोकरी करून त्या सुखात राहू शकल्या असत्या, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते.
advertisement
जिद्दीची ठिणगी कशी पडली?
दोन महत्त्वाच्या घटनांनी आरती यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. पहिली म्हणजे जिल्हाधिकारी (DM) अमृता सोनी यांची भेट. त्यांना पाहून "मी पण ऑफिसर का होऊ शकत नाही?" हा विचार त्यांच्या मनात रुजला. दुसरी घटना म्हणजे सोशल मीडियावर लहानपणीची मैत्रीण दिसली, जिच्या नावापुढे 'सायंटिस्ट, जर्मनी' असे लिहिले होते. या दोन गोष्टींनी आरती यांच्या स्वप्नांना बळ दिले. मात्र, सर्वात मोठा आघात त्यांच्या सहशिक्षिकेने केला, जिने भर शाळेत आरती यांना विचारले, "तुझी लायकी काय?" हा अपमान आरती यांच्या काळजाला लागला आणि त्यांनी ठरवलं की, आता संपूर्ण जगाला आपली लायकी काय ते दाखवून द्यायचं!
advertisement
जेव्हा मुलं म्हणाली, "आई तू आम्हाला जेवायलाही देत नाहीस..."
२०१८ मध्ये आरती यांनी 'पीसीएस'ची तयारी सुरू केली. प्री परीक्षा उत्तीर्ण झाल्या, पण मेन्समध्ये अपयश आले. स्वप्नांचा चुराडा झाला होता. दिवसा शाळा, घरकाम आणि रात्री ३ वाजेपर्यंत अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता. एकदा तर परिस्थिती अशी आली की त्यांची मुले रडत म्हणाली, "आई, तुझ्याकडे आम्हाला जेवण द्यायलाही वेळ नाही का?" डोळ्यात अश्रू होते, पण आरती यांनी ध्येयावरून नजर हटवली नाही.
advertisement
दिल्लीची 'ती' गोठवणारी थंडी आणि पतीचा सज्जड दम
मेन्स परीक्षेच्या तयारीसाठी जेव्हा अधिक वेळ हवा होता, तेव्हा घरात राहून अभ्यास करणे कठीण झाले. त्यावेळी पतीकडून एक कठोर अल्टिमेटम मिळाला - "जर परीक्षा द्यायची असेल, तर घर सोडून दिल्लीला जा." आरती यांनी हे आव्हान स्वीकारलं. मुलांची माया आणि घराचा उबदारपणा सोडून त्या दिल्लीच्या एका छोट्या पीजीमध्ये (PG) राहू लागल्या. हाडं गोठवणारी थंडी आणि एकटेपणाशी लढा दिला. डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय होतं... स्वतःला सिद्ध करणं!
advertisement
अखेर 'आरती' काय चीज आहे हे जगाला समजलं!
मेन्स क्लिअर झाली, मुलाखत दिली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा 'आरती गुप्ता' हे नाव गुणवत्ता यादीत १२ व्या क्रमांकावर (AIR 12) झळकत होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो पाहून त्यांचा मुलगा ओरडला, "बाबा, आईचा फोटो आलाय!" फतेहपूरमध्ये त्यांची पीसीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ज्यांनी कधीकाळी आरती यांची लायकी काढली होती, आज त्यांनाच या 'ऑफिसर आई'च्या जिद्दीपुढे नतमस्तक व्हावे लागले.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: तुझी लायकी काय? सहशिक्षिकेनं सुनावलं, नवऱ्यानेही दिला अल्टिमेटम अन् आरती गुप्ता झाल्या अधिकारी
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement