Kalyan News: “पाणी द्या, नाहीतर आम्हाला मारून टाका!”, केडीएमसी उपअभियंत्याच्या दालनात कल्याणमधील नागरिकांचे ठिय्या आंदोलन
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कल्याण पूर्वेतील नागरिकांना सतत उद्भवणाऱ्या पाण्याच्या प्रश्नांना कंटाळून महिलांनी थेट महानगरपालिकेच्याच कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले आहे.
कल्याण: महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर, कल्याण पूर्वेतील महिलांनी ठिय्या आंदोलन केले आहे. केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना सतत पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पाण्याच्या प्रश्नांना कंटाळून महिलांनी थेट महानगरपालिकेच्याच कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, कैलास नगर आणि आशेळे पाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कल्याण पूर्वेतील महिलांनी ठिय्या आंदोलन करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनाच जाब विचारला आहे.
"दररोज आमचे मुलं शाळेमध्ये बिना अंघोळीचेच जातात, सणांच्या दिवशीही घरात पाणी नाही, आम्ही थेंबथेंब पाण्यासाठी वणवण हिंडतोय," असं म्हणत कल्याण पूर्वेतील महिलांनी सोमवारी दुपारी केडीएमसीच्या ड वॉर्ड कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून विस्कळीत असलेला पाणी पुरवठा अजूनही सुरळीत नाही. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण पूर्वेतील शेकडो महिलांसोबत भाजप आणि शिंदेसेनेतील काही नगरसेवकांनीही पालिका प्रशासनावर सोमवारी मोर्चा काढला. संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत सर्वांची बोलतीच बंद केली.
advertisement
आंदोलक महिलांनी दोन तास पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता राजेश गोयल यांना त्यांच्या दालनातच घेराव घातला. आंदोलक महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सर्वांचेच लक्ष वेधले. "जर आम्हाला वेळेवर पाणी मिळत नसेल, तर आम्हाला मारून टाका. पालिकेच्या पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला मारून टाका, म्हणजे आमचा प्रश्न कायमचा सुटेल!" असं म्हणत कल्याण पूर्वेतील महिलांनी संपूर्ण केडीएमसीचं ऑफिस गाजवलं. यावेळी अभियंत्यांनी आंदोलक महिलांना पाणीटंचाईचे कारण स्पष्ट केलं. गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या कारणास्तव पाण्याची समस्या आहे, याबद्दल त्यांनी नागरिकांना माहिती दिली.
advertisement
केडीएमसीच्या उपअभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना पाणी सोडण्यासाठी समस्या उद्भवत होत आहे. उन्हाळ्यामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली असून पाण्यात कचरा येत असल्यामुळे शुद्धीकरणाला वेळ लागत असल्याची माहिती देत उपअभियंत्यांनी आंदोलकांना पाणीटंचाईच्या तांत्रिक बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर नागरिकांनी आम्हाला अश्वासन नको, पाणी हवे आहे, अशी ठाम भूमिका भाजपा नगरसेवकांनी आंदोलनामध्ये घेतली. जर लवकरात लवकर नागरिकांची पाण्याची समस्या दूर झाली नाही तर, संपूर्ण कल्याण पूर्व रस्त्यावर उतरून यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 6:46 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan News: “पाणी द्या, नाहीतर आम्हाला मारून टाका!”, केडीएमसी उपअभियंत्याच्या दालनात कल्याणमधील नागरिकांचे ठिय्या आंदोलन







