Mumbai Ahmedabad Traffic: मुंबई-अहमदाबाद महामार्गाची कोंडी फुटणार, मीरा-भाईंदरमध्ये खास प्लॅन, 15 डिसेंबरपासून लागू
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Ahmedabad Traffic : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता मीरा-भाईंदरमध्ये वाहतूक नियम बदलण्यात आले आहेत.
ठाणे: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मिरा-भाईंदर शहरात वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाढलेल्या वाहनांच्या दबावामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वेळ आणि इंधनाचा अपव्यय सहन करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून प्रायोगिक तत्त्वावर नवीन वाहतूक नियोजन अंमलात आणण्यात येणार आहे.
15 डिसेंबरपासून नवे बदल लागू
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी काशिमिरा रस्ता वगळता इतर सर्व पर्यायी अंतर्गत रस्ते एकमार्गिका (वन-वे) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हे बदल 15 डिसेंबरपासून लागू होणार असून सुरुवातीला प्रायोगिक स्वरूपात 15 ते 20 डिसेंबरदरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अंमलात असतील.
advertisement
महामार्गावर कोंडी वाढली
सध्या वसई-विरार परिसरातून तसेच परराज्यातून मुंबईकडे येणारी वाहने काशिमिरा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण करतात. काशिमिरा नाक्यावरची वाहतूक टाळण्यासाठी अनेक वाहनचालक अमर पॅलेस, डेल्टा गार्डन, पेणकर पाडा यांसारख्या अंतर्गत रस्त्यांचा वापर करू लागले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होत होता. विशेषतः पेणकर पाडा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मार्ग देण्यासाठी वसईच्या दिशेने जाणारी मुख्य वाहतूक थांबवावी लागत असल्याने महामार्गावरही कोंडी वाढत होती.
advertisement
काशिमिरा भागात वाहतुकीचे पुनर्नियोजन
ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काशिमिरा परिसरातील वाहतुकीचे पुनर्नियोजन केले आहे. नव्या नियमानुसार, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी वाहनचालकांनी केवळ काशिमिरा या मुख्य रस्त्याचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काशिमिरा परिसरातील सर्व पर्यायी रस्ते आता फक्त मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्ग असतील.
अमर पॅलेस पुलाखालून मुंबईच्या दिशेने वाहने जाण्यास परवानगी देण्यात आली असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात असतील. या प्रायोगिक योजनेनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ते कायमस्वरूपी बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या काळात वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 13, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Mumbai Ahmedabad Traffic: मुंबई-अहमदाबाद महामार्गाची कोंडी फुटणार, मीरा-भाईंदरमध्ये खास प्लॅन, 15 डिसेंबरपासून लागू










