ट्रॅफिकचे नियम बदलले, एक छोटी चूक आणि भरावा लागेल 25,000 रुपयांचा दंड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
परिवहन विभागाने रस्ते सुरक्षेसाठी नवीन ट्रॅफिक नियम लागू केले आहेत. मार्च 2025 पासून हे नियम देशभरात लागू होतील. उल्लंघन केल्यास दंड १० पट वाढवला आहे.
मुंबई: जर तुम्ही वाहन चालवत असाल, तर ट्रॅफिकच्या नवीन नियमांची माहिती असणं आता अत्यंत आवश्यक बनलं आहे. परिवहन विभागाने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल केले असून, हे नियम मार्च 2025 पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम १० पटपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि शिक्षा देखील अधिक कठोर करण्यात आली आहे. सीट बेल्ट न घालणं, हेल्मेट न घालणं, रेड लाइट तोडणं किंवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं, या सर्व प्रकरणांमध्ये आता मोठा दंड भरावा लागणार आहे.
नवीन नियमांनुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. जर कोणी वाहनचालक हेल्मेटशिवाय पकडला गेला, तर त्याला 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल, जो पूर्वी फक्त 100 रुपये होता. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करून तीन महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो. दुचाकीवर तीन जण बसल्यास म्हणजे ट्रिपलिंग केल्यास देखील 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
advertisement
रस्त्यावर रेसिंग करणं किंवा धोकादायक वेगाने वाहन चालवल्यास 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. एखाद्या चालकाने अॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन वाहनाला रस्ता न दिल्यास त्यावर 10,000 रुपयांचा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. दारू पिऊन वाहन चालविल्यास ही शिक्षा आणखी कठोर करण्यात आली आहे. पहिल्यांदा पकडल्यास 10,000 रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तर दुसऱ्यांदा पकडल्यास 15,000 रुपये दंड, दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात.
advertisement
जर कोणी रेड लाइट तोडली, तर त्याला आता 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल, जो पूर्वी फक्त 500 रुपये होता. त्याचप्रमाणे, वैध लायसन्स नसताना गाडी चालविल्यास 5000 रुपये दंड, पॉल्युशन सर्टिफिकेट नसल्यास 10,000 रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवास आणि गाडीचं इन्शुरन्स नसल्यास 2,000 रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये सामुदायिक सेवा करावी लागण्याचीही शक्यता आहे.
advertisement
गाडी चालवताना सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल, तर मोबाईल वापरत गाडी चालवल्यास 5,000 रुपये दंड ठोठावला जाईल. याशिवाय अल्पवयीन मुलगा/मुलगी वाहन चालवताना आढळल्यास त्याच्या पालकांवर 25,000 रुपयांचा दंड, तीन वर्षांची शिक्षा आणि संबंधित वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे, तर त्या व्यक्तीस 25 वर्षांपर्यंत लायसन्स दिला जाणार नाही.
advertisement
सरकारने हे बदल रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केले आहेत. या नवीन नियमांचं पालन करणं केवळ कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, तर तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी देखील अनिवार्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2025 1:45 PM IST