मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंतच का करतात हळदी कुंकू? पुन्हा का करता येत नाही?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Makar Sankranti: मकर संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रम करतात. पण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा सोहळा केला जाता? धर्मशास्त्रात याचं कारण काय आहे? याबाबत नाशिक येथील धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे यांनी माहिती दिलीये.
नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूवाच्या समारंभाचे आयोजन करतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदीकुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे, असं मानलं जातं.
advertisement
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्येतर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली आहे. जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व पाहायला मिळतं. इ.स. च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचं उल्लेख आहे. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व होतं. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात पाहायला मिळतं. दुर्गापुजेतही कुंकवाचे महत्त्व अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते, असे डॉ धरणे सांगतात.
advertisement
कुंकूचा पशुबळीशीही संबंध?
कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचं असतं, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत पाहायला मिळते.
advertisement
कुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानलं जाऊन लागलं. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणं मानलं गेलं. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरु झाली. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते ‘तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’.
advertisement
त्यानंतर चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू आणि संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू आजही केलं जातं. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आजही पाळली जाते.
कसं करायचं हळदीकुंकू?
हळदीकुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदीकुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा. सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावल्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लीत करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरुन सुहासिनी सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे. तिळगुळ देऊन नमस्कार करा. नववधूने पाच वर्ष हळदीकुंकूच कार्यक्रम करावा.
advertisement
हळदीकुंकू समारंभात वाण का देतात?
हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे होय.
advertisement
वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते. म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रातीमध्ये हळदीकुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रातीला वाण देणे याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो, असं धर्म अभ्यासक सांगतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
January 22, 2025 11:12 AM IST