शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीच्या नोंदणीबाबत मोठी अपडेट!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
E Pik Pahani : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 संदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल अॅप’ च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करू शकतात.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 संदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल अॅप’ च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करू शकतात. ही प्रणाली 1 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली असून, शासनाने शेतकऱ्यांना वेळेत पीक पाहणी करून नोंद पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
ई-पीक पाहणीची रचना
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत प्रत्येक हंगामासाठी दोन टप्प्यांमध्ये कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी स्वतः नोंद करू शकतात. यासाठी प्रत्येक हंगामाला सलग 15 दिवसांचे असे तीन कालखंड, म्हणजे एकूण 45 दिवस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात सहायक स्तरावरून उर्वरित खातेदारांची नोंदणी केली जाईल. यासाठीदेखील प्रत्येकी 15 दिवसांचे तीन कालखंड, म्हणजेच 45 दिवस दिले जातील.
advertisement
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दि. 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत स्वतः पीक पाहणी करण्याची संधी देण्यात आली होती. यानंतर दि. 15 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान सहायक स्तरावरून शिल्लक खातेदारांची नोंद केली जाईल.
रब्बी व उन्हाळी हंगाम
रब्बी हंगामात : दि. 1 डिसेंबर ते 15 जानेवारी शेतकरी स्वतः नोंद करू शकतील. त्यानंतर दि. 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी सहायकांकडून नोंदणी होईल.
advertisement
उन्हाळी हंगामात : दि. 1 एप्रिल ते 15 मे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कालावधी दिला असून, दि.16 मे ते 29 जून हा सहायक स्तरावरचा टप्पा असेल.
फळबाग पिकांसाठी सुविधा
फळबाग गटातील पिकांसाठी वर्षभरात कधीही शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतात. मात्र, सहायक स्तरावरील कालावधीत त्यांची नोंदणी केली जाणार नाही.
सातबारा उताऱ्याशी थेट संबंध
ई-पीक पाहणीची नोंद थेट सातबारा उताऱ्यावर चढवली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. ही नोंद नसल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ, पीकविमा किंवा मदत मिळणार नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरत आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
शेतकऱ्यांनी शक्य तितकी नोंद स्वतः करावी, असा शासनाचा सल्ला आहे. जर मोबाईल अॅप वापरताना किंवा पीक पाहणीदरम्यान तांत्रिक अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकारी किंवा गावात नियुक्त केलेले सहायक तत्काळ मदतीसाठी उपलब्ध राहतील.
दरम्यान, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी तसेच फळबाग पिकांसाठी ‘ई-पीक पाहणी मोबाईल अॅप’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. थेट सातबारा उताऱ्यावर नोंद चढवली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना शासकीय योजना, पीकविमा आणि मदतीचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:56 AM IST