Agriculture: शेतकऱ्यांवर नवं संकट; टोमॅटो, वांगी अन् कांदा शेतीला रोगांचा धोका, अशी घ्या काळजी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Agriculture: सध्याच्या काळात असणाऱ्या ढगाळ हवामानाचा कांदा, टोमॅटो आणि वांगी शेतीला फटका बसत आहे. रोगराई टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
सोलापूर: गेल्या काही काळात झालेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. आता ढगाळ हवामानाचा फटका टोमॅटो, कांदा आणि वांगी शेतीला बसत आहे. लाखोंचा खर्च करून पिकवलेलं पीक वाया जाण्याची भीती असून शेतकरी संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी या पिकांची काळजी कशी घ्यावी? हे लोकल18 च्या माध्यमातून सांगितले आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे शेतामध्ये लावलेल्या भाजीपाला पिकांना किड आणि रोगराईचा फटका बसत आहे. ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात भाजीपाला पिकांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
टोमॅटो पिकाची काळजी
ढगाळ हवामानात टोमॅटोवर विषाणूजन्य रोग, पांढरे किडी, मावा, तुडतुडे हा रोग पाहायला मिळतो. या रोगाचे व्यवस्थापन करायचं असेल तर फिप्रोनाईल 1.50 मिली प्रति लिटर आणि स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. त्यामुळे टोमॅटोवरील रोग आणि कीड नियंत्रणात आणता येतो.
वांग्यावर पडणारे रोग व व्यवस्थापन
वांग्याच्या शेतात देखील किड आणि रोगाचा प्रादुर्भाव ढगाळ हवामानात दिसून येतो. या वातावरणामध्ये किडलेले शेंडे, फळे दिसल्यास ते गोळा करावे आणि नष्ट करावे. तसेच थाइमेथोक्सन 50 मिली किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35 टक्के एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
advertisement
कांदा पिकाची काळजी
सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड केले जाते. ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकावर करपा हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. कांद्याला करपा रोगापासून वाचवण्यासाठी डायफेनोकोनाझोल 10 मिली दहा लिटर पाण्यामध्ये टाकून शेतामध्ये फवारणी केल्यास कांदा पिकाला करपा रोग होणार नाही, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सांगतात.
दरम्यान, ढगाळ वातावरणात किंवा पावसाळी वातावरणात भाजीपाला पिकांची योग्य काळजी घेतल्यास अधिकाधिक उत्पन्न घेता येते. त्यामुळे पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, असा सल्ला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 28, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture: शेतकऱ्यांवर नवं संकट; टोमॅटो, वांगी अन् कांदा शेतीला रोगांचा धोका, अशी घ्या काळजी






