पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, दिले मोठे आदेश
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाकडे गांभीर्याने पाहत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करून महसूल विभागाच्या मदतीने अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. ते पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते.
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यातील 22 जिल्ह्यांतील एकूण 8 लाख 78 हजार 767 हेक्टरवरील पिके पावसामुळे बाधित झाली आहेत.
नांदेड जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून 2,85,543 हेक्टरवरील पिके जलमय झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 1,18,359 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले.
बुलढाणा (89,778 हेक्टर), अकोला (43,703 हेक्टर), सोलापूर (41,472 हेक्टर), हिंगोली (40,000 हेक्टर) आणि धाराशिव (28,500 हेक्टर) हे जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.
advertisement
चंद्रपूर, वर्धा, सांगली, नाशिक, जळगाव, बीड, परभणी, जालना आणि संभाजीनगर येथेही नुकसान झाले असून पिकांची मोठी हानी झाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले
कृषीमंत्री भरणे यांनी बैठकीत स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी. कुठल्याही योजनेतील निधी परत जाणार नाही, तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच वापरला जाईल. नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना द्यावी, जेणेकरून शेतकरी संकटातही टिकून राहतील. शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची तयारी आहे.
advertisement
सरकारची ठाम भूमिका
भरणे यांनी नमूद केले की, सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे प्रचंड संकट आले असले तरी सरकार त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्यांमध्ये अचूकता ठेवून आणि प्रक्रियेला गती देऊन अहवाल राज्य सरकारकडे पाठवावा, जेणेकरून मदत लवकर मंजूर होईल.
त्याचबरोबर, नांदेड आणि यवतमाळसह मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे या भागांना विशेष प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
दरम्यान, सध्या राज्यातील जवळपास 9 लाख हेक्टरवरील पिकांची हानी शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकणारी आहे. अशातच लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:10 AM IST