बँक कोणतीही असो.., शेतकरी कर्जमाफीच्या पात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत राज्य सरकार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली जात असल्याचे सरकारने सांगितले आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी लागू होणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे.
कर्जमाफीसोबत प्रामाणिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन
सरकारने केवळ कर्जमाफीच नव्हे तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे सरकारचे मत आहे.
advertisement
सरकारच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकारणही तापले आहे. विरोधकांनी या योजनेवर जोरदार टीका करत ही कर्जमाफी अपुरी असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीने सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत अधिक व्यापक कर्जमाफीची मागणी केली आहे.
सर्व प्रकारच्या बँकांच्या कर्जाला लागू होणार योजना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत स्पष्ट करताना काही अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगितले. काहीजण राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, तर काहीजण जिल्हा बँका किंवा सहकारी संस्थांच्या कर्जाबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असो, ते माफ केले जाईल. ज्या बँका किंवा संस्थांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा सर्व संस्थांकडून घेतलेले कर्ज या योजनेत समाविष्ट असेल. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका किंवा पतसंस्था अशा सर्व ठिकाणांहून घेतलेल्या पीक कर्जाचा या योजनेत समावेश होणार आहे.
advertisement
30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचा प्रयत्न
सरकारचा प्रयत्न हा शेतकऱ्यांना थेट दिलासा देण्याचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीचा फायदा बँकांना नव्हे तर थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजना तयार केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा सरकारचा प्रयत्न असून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती सध्या निकष आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर काम करत आहे.
advertisement
कोणते शेतकरी पात्र ठरणार?
सरकारने जाहीर केलेल्या प्राथमिक निकषांनुसार पुढील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत .
दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी.
केवळ पीक कर्ज थकबाकी असलेले शेतकरीच या योजनेसाठी पात्र असतील.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफीसाठी ग्राह्य धरले जाईल.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 8:30 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
बँक कोणतीही असो.., शेतकरी कर्जमाफीच्या पात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सांगितलं








