कोकणच्या राजावर तिहेरी संकट! हापूस आंब्यासाठी वाट पाहावी लागणार, नेमकं घडलं काय?
- Reported by:Sitraj Ramesh Parab
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Konkan Hapus: यंदा लांबलेल्या पावसामुळे आंबा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच थंडीने दांडी मारल्यने हापूसचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग: सतत बदलत्या हवामानाचा परिणाम कोकणातील निसर्गावरही झालेला पाहायला मिळत आहे. कोकणच्या हापूस आंब्याला देखील याचा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीपर्यंत पाऊस होता. त्यामुळे थंडी गायब होती. याचा परिणाम आंब्याला मोहोर येण्यावर झाला आहे. यंदा हापूस आंब्याला मोहोर उशिरा आला आहे. अशातच नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने आलेला मोहोरही काही प्रमाणात गळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना तिहेरी संकटाला सामोरं जावं लागत असून आंबा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
आंबा कलमाला मोहर येण्यासाठी पाऊस कमी लागतो. पावसाळ्या नंतर थंडी सुरु झाली की कलमांना मोहोर येण्यास सुरुवात होते. पण यंदा दिवाळीपर्यंत थंडी गायब होती आणि पाऊस देखील सुरू होता. यामुळे काही आंब्याला मोहोर येण्यास उशीर झाला आहे. त्यातच नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका आंबा बागांना बसला आहे. जिल्ह्यातील काही भागात आंबा मोहोर टिकवण्यास शेतकऱ्यांना यश आले. पण पावसामुळे त्या मोहोराचे नुकसान झाले आहे. यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आंबा उत्पादक पुंडलिक सावंत यांनी व्यक्त केलीये.
advertisement
आंब्याला मोहोर येण्यास उशीर
वातावरण बदलाचा फटका आंबा बागायतीला बसलेला आहे. पावसामुळे आंबा बागायतीवर फवारणीचा खर्च देखील वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्यक आहे. थंडी जर चांगल्याप्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिरा येतो. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम दिसून आला आहे, असे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात.
advertisement
पाण्याचा ताण महत्त्वाचा
थंडीबरोबरच पाण्याचा ताणदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. पावसाळा संपल्यानंतर हा ताण झाडाला मिळण्यास सुरवात होते. जर पाऊस नियमित पावसाळा सोडून पुढेदेखील पडत राहिला, म्हणजे जर नोव्हेंबरपर्यंत पडत राहिला, तर आंब्याची मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते व आंब्याला मोहोर उशिरा येतो. यंदा देखील पावसाची अशीच परिस्थिती आल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहेत. त्यामुळे या वर्षी आंबा बाजारात येण्यास विलंब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
Nov 17, 2024 4:18 PM IST









