Farmer Success Story : शेतकऱ्याला मानलं, खराब होणाऱ्या केळीवर शोधला उपाय, आता वर्षाला कमावतो 50 लाख!
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी सध्याला शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. जळगावमधील शेतकरी अशोक गाडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी शेतीसोबत नवीन एक जोडधंदा सुरू करून अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक काम केले आहे.
नाशिक : शेतकरी सध्याला शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. जळगावमधील शेतकरी अशोक गाडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी शेतीसोबत नवीन एक जोडधंदा सुरू करून अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक काम केले आहे. अशोक गाडे यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन प्रॅक्टिस सुरू केली होती. अशोक यांच्या कमी वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांनी आपली वकिली सोडून आपल्या 12 एकरच्या केळीच्या बागेची जबाबदारी स्वीकारली आणि शेतीत पाऊल टाकले आणि सुरू झाला त्यांचा हा प्रवास.
शेतीत उतरण्यापूर्वी त्यांनी अनेक लोकांकडून मार्गदर्शन घेतले आणि अभ्यासानुसार आणि मिळालेल्या माहितीनुसार ते आधुनिक शेती करू लागले. परंतु केळी ही अत्यंत लवकर खराब होणाऱ्या पिकांपैकी एक आहे. त्यामुळे बाजारातील चढ-उतार, वाहतुकीतील अडचणी आणि खराब झालेले उत्पन्न हे सगळे त्यांनी जवळून अनुभवले. यावर काहीतरी उपाय म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नी कुसुम गाडे यांनी केळीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी केळीचे चिप्स, जॅम, कँडी, पापड, शेव, लाडू अशी विविध उत्पादने तयार केली. परंतु सर्वात जास्त लोकप्रिय ठरले ते त्यांचे युनिक प्रॉडक्ट म्हणजे केळीचे बिस्किट. हे बिस्किट लहान-मुले तसेच सर्व आवडीने त्यांच्याकडे मागणी करू लागले.
advertisement
या बिस्किटांच्या मागणीने त्यांच्या आयुष्याला नवे वळण दिले. सुरुवातीला 400 ते 500 प्रतिकिलो दराने विकली जाणारी ही बिस्किटे आता आठवड्याला 60 ते 100 किलो विकली जातात. या नवीन व्यवसायामुळे त्यांना दरवर्षी सुमारे 25 लाखांचे उत्पन्न फक्त बिस्किटांमधून मिळत आहे. त्यातच त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचा विचार केला असता, अशोक गाडे यांचा वार्षिक टर्नओव्हर आज 50 लाखांच्या आसपास पोहोचला आहे.
advertisement
ज्यात ते केळीचे चिप्स, केळीचे चॉकलेट, केळीचा चिवडा, केळीचा उपवासाचा चिवडा, लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ जॅम असे अनेक प्रकारचे केळीचे नवीन नवीन पदार्थ ते बनवत असतात. त्यांनी त्यांच्या या केळीच्या बिस्किटांच्या रेसिपीचे पेटंट देखील घेतले आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. तसेच हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर सध्या विदेशात देखील आपले बिस्किटे पोहोचवत आहेत.
advertisement
अशोक गाडे यांनी आता संकल्प एंटरप्रायझेस या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आज ते स्वतःच्या शेतातील मालासोबत 50 हून अधिक स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळीचा माल घेत असतात. त्यांनी केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवलेले नाही, तर इतर शेतकऱ्यांना देखील मूल्यवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन त्यांचेही आर्थिक जीवन सुसंपन्न केले आहे. आज ते त्यांच्या या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे तसेच त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या मजुरांचे घर चालवत असतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 29, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : शेतकऱ्याला मानलं, खराब होणाऱ्या केळीवर शोधला उपाय, आता वर्षाला कमावतो 50 लाख!








