PM Kisan चा हप्ता या आठवड्यात येणार की वेळ लागणार? नवीन अपडेट काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan 21 Installment : देशातील जवळपास 9.7 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुंबई : देशातील जवळपास 9.7 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी 2000 रुपये जमा होतात, मात्र या वेळी हप्ता उशिरा मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
काही राज्यांना आधीच मिळाला हप्ता
पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील काही राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच 21व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने या राज्यांतील लाभार्थ्यांना प्राधान्याने 2000 रुपयांचा हप्ता वितरित केला. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना 7 ऑक्टोबर रोजीच हा हप्ता मिळाला होता. मात्र महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळायचे आहेत.
advertisement
हप्ता कधी मिळणार?
माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आधी ऑक्टोबरच्या शेवटी हा हप्ता देण्याची तयारी होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे आणि काही राज्यांतील पडताळणी प्रक्रियेमुळे तो लांबला. केंद्र सरकारकडून अंतिम यादी तयार करण्यात येत आहे आणि निधी हस्तांतरणासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तेव्हाच रक्कम मिळेल.
advertisement
केवायसी पूर्ण करणे आवश्यक
या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी अद्याप केवायसी केली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन OTP आधारित KYC करू शकतात किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
advertisement
कोण पात्र आहेत?
ज्या शेतकऱ्यांनी याआधीचे सर्व हप्ते नियमितपणे घेतले आहेत आणि ज्यांची जमीन व लाभार्थी माहिती पोर्टलवर सत्यापित आहे, त्यांनाच 21वा हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा बँक खाते/आधार क्रमांक जुळत नाही, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांची मागणी
view commentsदरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये देण्यात येतात. ग्रामीण भागात रब्बी हंगामाची सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना या रकमेची मोठी गरज आहे. बियाणे, खते आणि सिंचनासाठी निधीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे हप्ता लवकर द्यावा अशी मागणी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:11 AM IST


