राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकर्यांना आता दिवसा सौर वीज मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Kusum Yojana : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘कुसुम घटक ब’ सौर कृषीपंप योजनेसाठी (Kusum Scheme) आवश्यक निधी उभारण्यासाठी सरकारने औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांवर अतिरिक्त वीजदराचा भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना दर महिन्याच्या वीजबिलात वाढ सहन करावी लागेल; परंतु याच निधीतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बहुतांश वेळा रात्रीच्या सत्रात वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे सिंचन, शेतीकामे आणि कामगार व्यवस्थापनात मोठ्या अडचणी येतात. ‘कुसुम घटक ब’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप उपलब्ध होतील. यामुळे डिझेल पंपांचा खर्च कमी होईल, विजेवरील अवलंबित्व घटेल आणि शेती अधिक शाश्वत व कार्यक्षम बनेल.
advertisement
‘कुसुम घटक ब’ म्हणजे काय?
प्रधानमंत्री कुसुम योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तिच्या घटक ब टप्प्यात शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप पुरवले जातात. याचा उद्देश शेतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक विजेवरील भार कमी करणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
वीज विक्रीकरात ९.९० पैशांची वाढ
राज्य सरकारने औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांसाठी वीज विक्रीकरात ९.९० पैसे प्रति युनिटने वाढ केली आहे. पूर्वी हा कर ११.०४ पैसे होता, जो आता वाढून २०.९४ पैसे प्रति युनिट इतका झाला आहे. म्हणजेच प्रत्येक युनिट विजेसाठी सुमारे दहा पैशांचा अतिरिक्त खर्च उद्योगांना करावा लागेल. या वाढीमुळे मोठ्या उद्योगांसह व्यापारी प्रतिष्ठानांना दर महिन्याला शेकडो ते हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक ताण बसणार आहे.
advertisement
सरकारच्या मते, या करवाढीतून मिळणारा महसूल थेट ‘कुसुम घटक ब’ योजनेसाठी वापरण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवसभरातील विजेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
उद्योग आणि व्यापाऱ्यांवर ताण
या करवाढीमुळे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच उत्पादन खर्च, कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांचे वेतन वाढल्याने उद्योग क्षेत्रावर आर्थिक ताण आहे. त्यामुळे आता वीजदरवाढीमुळे त्यांचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) या निर्णयाचा मोठा फटका बसेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. काही व्यापारी संघटनांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
advertisement
महावितरणवरील भार कमी
सरकारच्या मते, या निर्णयामुळे महावितरणवरील क्रॉस सबसिडीचा भार काही प्रमाणात कमी होईल. याआधी उद्योगांनी अधिक दर भरून शेतकऱ्यांना सवलतीची भरपाई करायची होती; मात्र आता हा निधी थेट कररूपाने जमा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार
‘कुसुम घटक ब’ योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा शक्य होणार आहे. शाश्वत शेती, ऊर्जा बचत आणि उत्पादनवाढ या तिन्ही क्षेत्रांमध्ये या योजनेचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 2:18 PM IST