मराठवाड्यातील मित्रांनी मिळून शेतीत केली कमाल! आधी २.५ लाख खर्च,आता वर्षाला करताय ५ कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : शेती म्हणजे तोट्याचा आणि अनिश्चिततेचा व्यवसाय अशी धारणा आता बदलू लागली आहे.
मुंबई : शेती म्हणजे तोट्याचा आणि अनिश्चिततेचा व्यवसाय अशी धारणा आता बदलू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि नव्या कल्पनांची जोड दिली, तर शेती ही नफ्याची आणि टिकाऊ उद्योजकता ठरू शकते, हे विदर्भातील तीन तरुणांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. परशराम आखरे, डॉ. अमित देशमुख आणि वैभव घरड या तिघांनी मिळून सुरू केलेल्या ‘कृषी सारथी’ या स्टार्टअपने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
पारंपरिक शेतीत हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार आणि दलालांवर असलेले अवलंबित्व यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘कृषी सारथी’ची संकल्पना आकाराला आली. अवघ्या अडीच लाख रुपयांच्या सुरुवातीच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या चार वर्षांत तब्बल पाच कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. विशेष म्हणजे, या स्टार्टअपमुळे १८० पेक्षा अधिक तरुणांना थेट रोजगार मिळाला असून ३५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळाले आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा
‘कृषी सारथी’ने शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या माध्यमातून बियाणे, खते, कीटकनाशके तसेच आधुनिक शेतीसाठी आवश्यक उपकरणे थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जातात. २४ तासांच्या आत सेवा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. व्यापाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहात नाही, हा या उपक्रमाचा मोठा फायदा आहे.
advertisement
मातीच्या आरोग्यावर भर, तंत्रज्ञानाची जोड
शेती शाश्वत आणि दीर्घकाळ नफ्याची राहावी, यासाठी ‘कृषी सारथी’ने बायोचार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. यामुळे मातीची सुपीकता वाढते आणि उत्पादन खर्चात घट होते. यासोबतच, पीक संरक्षण आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंगवर आधारित उपाय विकसित करण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांवरील रोग, कीड आणि हवामानातील बदलांचा अंदाज आधीच मिळतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाचा वेगाने विस्तार होत आहे.
advertisement
कार्बन क्रेडिटद्वारे आंतरराष्ट्रीय संधी
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणखी भर घालण्यासाठी ‘कृषी सारथी’ने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करत कार्बन क्रेडिट उपक्रम सुरू केला आहे. जैविक आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळतो. पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देतानाच शेतकऱ्यांसाठी हा एक नवा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे.
सन्मान आणि प्रेरणादायी वाटचाल
परशराम आखरे यांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. आयआयटी मुंबईतील संशोधनाचा अनुभव शेती क्षेत्रात उपयोगात आणत त्यांनी हा उपक्रम उभा केला. त्यांच्या नवकल्पनांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२२ मध्ये ‘कृषी सारथी’ला ‘उत्कृष्ट कृषी स्टार्टअप’ पुरस्काराने गौरवले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 7:17 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मराठवाड्यातील मित्रांनी मिळून शेतीत केली कमाल! आधी २.५ लाख खर्च,आता वर्षाला करताय ५ कोटींची कमाई









