Weather Update: 24 तासांत मोठी हवापालट, ठाण्यासह 6 जिल्ह्यांवर वादळी पावसाचं संकट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर येथे यलो अलर्ट; पावसाचा अंदाज, तापमान वाढले, शेतकऱ्यांना खबरदारीचा सल्ला.
जानेवारी महिना सरला असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्याच्या वातावरणात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर ओसरला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. याचाच अर्थ, गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी हुडहुडी आता कमी झाली असून रात्रीचा गारवा उबदारपणात बदलत आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुठे होऊ शकतो पाऊस?
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टरबन्सचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांवर जाणवू शकतो. उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसाच्या सरी किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहून पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
advertisement
धुळे, जळगाव, नाशिक, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता अधिक आहे.
थंडीचा मुक्काम हलला!
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. रात्रीच्या तापमानात ही वाढ झाल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तरी कडाक्याची थंडी परतण्याचे कोणतेही संकेत नाहीत.
advertisement
पर्यटकांना आणि शेतकऱ्यांना सल्ला
जर तुम्ही या दिवसांत हिमाचल किंवा काश्मीरमध्ये स्नोफॉल पाहण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे सध्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले असून वाहतूक कोंडीचा मोठा धोका आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन सावधगिरीने करा. तसेच, जळगाव आणि नाशिक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पाऊस आणि ढगाळ वातावरण लक्षात घेऊन काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती खबरदारी घ्यावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 7:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: 24 तासांत मोठी हवापालट, ठाण्यासह 6 जिल्ह्यांवर वादळी पावसाचं संकट









