अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी या वर्षी अतिवृष्टी आणि बाजारातील भावघसरणीच्या दुहेरी संकटात सापडले आहेत. पावसाने कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झालाच, पण आता बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. सध्या कापसाला केवळ ६ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत असून, अपेक्षित दराच्या निम्म्यानेच व्यवहार सुरू आहेत. दुसरीकडे, कांद्याच्या दरात घसरण होऊन तो शेतातच कुजण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदाऐवजी शेतकऱ्यांवर आर्थिक अंधार दाटला आहे.
advertisement
अतिवृष्टीने कापसाचे नुकसान, उत्पादनात मोठी घट
गेल्या काही वर्षांत श्रीगोंदा तालुक्यात कापसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले असून यंदा सुमारे १५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र, सततच्या पावसामुळे बोंडगळ निर्माण झाली आणि उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या चांगल्या भावाची अपेक्षा होती. प्रति क्विंटल १० ते ११ हजार रुपये मिळतील, अशी आशा होती. पण बाजारात सध्या भाव केवळ ५,८०० ते ६,००० रुपयांवर आला आहे.
आयात धोरणामुळे स्थानिक कापूस उद्योग संकटात
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर कॉटन धागा आयात करण्यास परवानगी दिली, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत स्थानिक कापसाची मागणी घटली आहे. व्यापाऱ्यांनी परदेशी धाग्याचा साठा करून ठेवला असून, त्यामुळे देशातील जिनिंग मिल्स आणि कापूस उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर “एका बाजूला स्वदेशीचा नारा, तर दुसऱ्या बाजूला परदेशी मालाला प्रोत्साहन”, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे उद्योग मजबूत, पण शेती सलाइनवर, असे चित्र निर्माण झाले आहे.
कांदा दर कोसळले, शेतकऱ्यांच्या हातात धोंडा
कापसासारखीच दैना कांद्याची झाली आहे. सध्या श्रीगोंदा तालुक्यात कांद्याचा दर १ ते १.५० रुपये किलो इतका मिळत आहे. शेतकऱ्यांकडून इतक्या कमी दराने खरेदी होणारा हाच कांदा शहरातील मॉल आणि बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. चार ते पाच महिने मेहनत, सिंचन, खते आणि औषधांचा खर्च करून पिकविलेल्या या पिकासाठी शेतकऱ्यांच्या हाती फक्त नुकसानच उरले आहे. परिणामी, अनेक कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.